रत्नागिरी : खेडजवळ ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार | पुढारी

रत्नागिरी : खेडजवळ ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

खेड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गावरील वेरळ येथील हॉटेल गणपती कृपा समोर ट्रक आणि दुचाकीचा आज (दि.१७) दुपारी २.४५ च्या सुमारास भीषण अपघात झाला. यात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आतिफ सोलकर (रा.उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी मुंबई – गोवा महामार्गावरून ट्रक (एम एच ०४ ई वाय ८७७५) गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी हॉटेल गणपती कृपा समोरून खेडहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून (एम एच ०८ ए.ई. ५१२३) तरूण जात होता. यावेळी ट्रकच्या टाकाखाली दुचाकीस्वार सापडून त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर दुचाकी ट्रकखाली अडकून राहिल्याने २० ते २५ फूट ट्रकसोबत फरपटत गेली.

या घटनेनंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, वेरळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

दरम्यान, महामार्ग बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने वाहतूक वळविली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button