रत्नागिरीहून मुंबईकडे निघालेली बस पेटली; चालकाच्या प्रसंगावधानाने २२ जण बचावले | पुढारी

रत्नागिरीहून मुंबईकडे निघालेली बस पेटली; चालकाच्या प्रसंगावधानाने २२ जण बचावले

श्रीकृष्ण बाळ

महाड ः  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदी पुलाजवळ बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथून मुंबईकडे जाणार्‍या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी प्रवासी बसचा उजव्या बाजूकडील मागील टायर फुटून आग लागल्याने, या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील 19 प्रवासी व अन्य तीन कर्मचारी यांना सुखरूप बाहेर काढल्याने, सुदैवाने कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती समजतात महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस पथक तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले. याचवेळी औदुंबर छाया ट्रॅव्हल्स कंपनीचीच रत्नागिरीकडे जाणारी बस या मार्गावर होती. त्या बसमधून परतीच्या प्रवासासाठी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना पोलिसांनी बसवून मुंबईला पाठवल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती आंधळे यांनी दिली आहे.

सुमारे सात वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री पूल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये 40 पेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर सात वर्षांपूर्वीच्या कटू आठवणीं जाग्या होऊन ,सावित्री नदि पूल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे.

Back to top button