Karul Ghat : करूळ घाट २२ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत वाहतुकीसाठी बंद
वैभववाडीः पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणारा महत्त्वाचा करुळ घाटातील रस्ता मजबुतीकरण व दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे घाट दि. २२ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ दरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर करुळ घाटातील वाहतूक फोंडा घाट, भुईबावडा घाट व अनुस्कुरा घाटातून वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. Karul Ghat
तळेरे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटाचे मजबुतीकरण व रुंदीकरण काम सुरु करण्यात आले आहे. तर लवकरच रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या दरम्यान करुळ घाटातून एकेरी वाहतूक चालू ठेवणे शक्य नाही. घाट रस्ता तीव्र चढ उतारांचा आणि वेडीवाकडी वळणांचा आहे. घाटातून अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे काम विना अडथळा होण्यासाठी घाट बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन घाटमार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. Karul Ghat
दरम्यान, या घाटातील प्रवाशी व अवजड वाहतूक ही मुख्यतः फोंडा घाटातून, तर फक्त प्रवाशी वाहतूक भुईबावडा घाटातून आणि अनुस्कुरा घाटातून प्रवाशी व अवजड वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी वाहतुकीसाठी रस्ते आणि मार्ग प्रवाशांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशा दर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे, समजेल अशा भाषेत लावण्याचे किंवा उभारण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
हेही वाचा