अकोले पोलिस ठाण्याला दुष्काळात तेरावा महिना ; 23 जणांची बदली
अकोले : राजेंद्र जाधव : अकोले तालुक्यात पोलिसांच्या सरहद्दीचा विचार करता या परिसरात सध्या असलेले पोलिस मुळातच तोकडे असताना नुकत्याच झालेल्या पोलिस कर्मचार्यांच्या बदल्यांमध्ये अकोल्यात तब्बल 23 पोलिस कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहे. त्या बदल्यात येथे तितकेच कर्मचारी अपेक्षित असताना फक्त 5 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. तर पोलिस निरीक्षक सुभाष भोयेची नाशिकला बदली झाल्याने नवीन पोलिस अधिकार्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अकोले पोलिस ठाण्याची अवस्था दुष्काळात तेरावा महिन्यासारखी झाली आहे. कोल्हार घोटी राज्य महामार्गावर असलेल्या अकोले तालुक्याचा वाढता विस्तार व दिवसागणिक वाढणारे नागरीकरण तसेच पर्यटकस्थंळ, शिखर, कारखाना आहेत. 2011 च्या जनगणने नुसार दोन लाख जनतेच्या संरक्षणाची जंबाबदारी फक्त 44 पोलिसदादा वर पडली आहे.
अकोले परिसराचा मोठा विस्तार लक्षात घेता अकोल्यात अधिकचे पोलिस बळ गरजेचे आहे. मात्र, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणार्या पोलिसांची कुमक या बदल्यांमध्ये अचानक कमी झाल्याने येणार्या दिवसांत अकोले, कोतुळ, समशेरपुर परिसरात कायदा व सुव्यवस्था कशी राखणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शासन दरबारी बदली ही कोणत्याही कर्मचार्यांच्या दृष्टीने नेहमीचीचं प्रक्रिया असली तरी दोन न्या आणि दोन द्या’ या सूत्राला अनुसरून बदली होणे क्रमप्राप्त असते. परंतु अकोले बाबतीत मात्र 23 जणांची एकाच वेळी बदली झाली. झालेली बदली पाहता त्या बदलात केवळ पाच कर्मचारी दिले गेले आहे. यामुळे लोकसंख्येत दिड लाखाच्या घरात पाय ठेवणारे अकोल्याला जोडलेल्या समशेरपुर व कोतुळ दूरक्षेत्राचा विचार केल्यास केवळ 43 कर्मचारी अन् एका पोलिस निरीक्षकावर सर्व भार आला आहे. यामुळे रोजचे तपासी तक्ते, साप्ताहिक सुट्या अन् हजेरी वहीत लावलेल्या सेवा पाहता 13 ते 15 हजार माणसांमागे एक कर्मचारी खडा पहारा कसा प्रकारे ठेवेल हा मुख्य प्रश्न निमार्ण झाला आहे.
प्रस्ताव धूळखात…….
कोतुळ, समशेरपुर हे दोन नवीन पोलिस स्टेशनचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षापासुन शासनदरबारी धुळ खांत पडला आहे. दर दरवर्षी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून फक्त नवीन पोलिस स्टेशनबाबतची माहिती मागवण्याचे काम केले जात आहे. शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू असल्याचे समोर येत आहे.
दुसर्या वाहनाची गरज
अकोले पोलिस ठाण्याची हद्द ही बिताका सुमारे 50 कि.मी तर पुणे हद्द भोजदरी फाटा 55 कि.मी आहे. अकोले आजूबाजूला असलेली सुमारे 125 गावे, वाड्या, वस्त्या आहेत. खिरविरे, ब्राम्हणवाडा, बंदगीबेलापुर, कोतुळ, देवठाण ही गावेही येतात. अकोले पोलिसांच्या हद्दीचा विचार करता या ठिकाणी पोलिसांसाठी एकच वाहन आहे. ते पण कधी-कधी नेते, पुढारी, अधिकार्याबरोबरचं व्हीआयपींच्या दिमतीला असते. त्यामुळे दुसर्या वाहनाची आवश्यकता निर्माण झाली आहे.