श्रीरामपूर भाजपचा उपक्रम देशात दिशादर्शक : महसूलमंत्री विखे
श्रीरामपूर(नगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर भाजपच्या पदाधिकार्यांनी सकारात्मकतेचे उत्तम उदाहरण सर्वांसाठी घालून दिले आहे. स्वतः पुढाकार घेत परिसरातील उद्योजक, डॉक्टर्स, अभियंते, व्यापारी यांनाही समाजसेवेच्या या प्रवाहात जोडण्याचे मोठे काम करून दाखविले. त्यांचा हा उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय उराशी बाळगून पदाधिकारी काम करीत आहेत. हा विकास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करतात. असा श्रीरामपूरसारखा आदर्श उपक्रम राज्यातच नव्हे तर देशातही झाला नाही. सर्वांसाठी तो दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी श्रीरामपूर भाजपा संयोजकांना उद्देशून काढले.
भाजपाच्या श्रीरामपूर शाखेकडून तालुक्यातील गरजू व गरीब दीडशे कोरोना एकल महिलांना शिलाई मशिनचे वाटप मंत्री विखे यांच्या हस्ते तर भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. येथील खा. गोविंदराव आदिक सभागृहात पार पडलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महामंत्री विजय चौधरी होते.
मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आ. वैभव पिचड, अकोलेच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीराज डेरे, संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले, उपाध्यक्ष कोरोना एकल समितीचे समितीचे समन्वयक मिलींदकुमार साळवे, तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात तालुक्यात सुमारे 350 पुरुष मृत पावले. त्यांच्या कोरोना एकल महिलांची श्रीरामपूर भाजपाच्या पदाधिकार्यांनी माहिती घेतली. त्यांच्या घरी जाऊन त्यांची परिस्थीती जाणून घेतली. यापैकी 150 महिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याची दिसले. या महिलांना रोजगार देण्यासाठी काही करता येईल का, असा विचार पुढे आल्यानंतर त्यांना शिलाई मशिनचे वाटप करण्याचा निर्णय राठी, बिंगले, साळवे व भाजपा पदाधिकार्यांनी एकमताने घेतला. शहरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने 150 मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यांचे वाटप या समारंभात करण्यात आले.
या विशेष उपक्रमाचे कौतुक करताना, भाजपच्या या कार्यकर्त्यांकडून जनतेची आलेली कल्याणकारी कामे तातडीने मार्गी लावा, अशा सूचना मंत्री विखे यांनी अधिकार्यांना केल्या. वाळू विक्री संदर्भात मंत्री विखे म्हणाले, 15 दिवसांपूर्वी दिलेला शब्द पाळला आहे. आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात 600 रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध होईल. यातून वाळूमुळे फोफावलेली गुंडगिरी मोडीत निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महामंत्री चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विविध काल्याणकारी योजनांबाबत माहिती दिली. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर भाजपने हा उपक्रम हाती घेतला. यामुळे 150 महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न तर सुटला आहेच, शिवाय भविष्यात त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असणार आहे.
गोंदकर म्हणाले, या चांगल्या कामासाठी समाजातील सर्वच स्तरातून भरभरून मदत मिळाली. आम्ही मदत गोळा करीत असताना अभियंते, डॉक्टर या सधन वर्गाने मदत केलीच, शिवाय लॅब असिस्टंट, छोटे व्यापारी यांनीही भाजपाच्या या सकारात्मक उपक्रमास भरभरून मदत केली. हाच खरा भाजपावर दाखविलेला विश्वास असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक गणेश राठी तर स्वागत शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी केले. यावेळी मिलींदकुमार साळवे यांचे भाषण झाले.
यावेळी श्रीरामपूर पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकार्यांसह रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून चमदार कामगिरी करणार्या हर्षल घुगे याचा सत्कार मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अजित बाबेल, रवी पंडित, साजिद शेख, मुन्ना शेख, विजय आखाडे, अरुण काळे, नारायण काळे, बंडू हापसे, मुकुंद लबडे, सतिश सौदागर, सुनील वाणी, संजय माखिजा, राजेश राठी, सुनील चंदन, गणेश अभंग, विशाल यादव, किरण रोकडे, जस्पाल सिंग सहाणी, राजू धामोणे, चंद्रकांत परदेशी, डॉ. ललित सावज, अरुण शिंदे, गोविंद कांदे, रवी खटोड, भरत साळुंखे, रूपेश हारकल, दत्तू देवकाते, अनिल भनगडे, महिला शहराध्यक्षा पूजा चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा रेखा रिंगे, राहुल आठवल, योगेश ओझा, सुजीत तनपुरे, किरण रक्टे आदी उपसथित होते.
कोरोना काळात उद्धव ठाकरे घरात बसले होते..!
कोरोना महामारीच्या काळात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले होते. याचवेळी भारतीय जनता पक्षाचे सुमारे 3 हजार कार्यकर्ते मदतीसाठी रस्त्यावर होते. त्यांनी अहोरात्र मेहनत करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवली. मदत करणार्याला कारणांची गरज नसते, मात्र ज्या व्यक्तींची वृत्ती मदतीची नसते, स्वार्थी असते असे लोक घरात बसण्यासाठी कारणे शोधत असतात, अशा परखड शब्दांमध्ये महामंत्री चौधरी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी टीकास्त्र सोडले.
साळवे यांच्या कार्याचे मंत्री विखेंकडून कौतुक..!
जमिनीची मोजणी आता यंत्राद्वारे सहज सोप्या पद्धतीने होणार आहे. वर्षानुवर्षे वाट पाहवे लागण्याचा तो त्रास आता कमी होणार आहे. या नवीन पद्धतीमुळे अवघ्या 15 दिवसांमध्ये जमीन मोजणीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने घरपोहोच मिळेल, असे ठणकावून सांगितले. दरम्यान, कोरोना एकल महिला समितीतर्फे निःस्वार्थपणे काम केल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी मिलींदकुमार साळवेंचे कौतुक केले.