अहमदनगर : वाळू माफियांची माफियागिरी चालू देणार नाही - सुजय विखे
संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात येथून मागे फक्त वाळू माफियांचेच राज्य होते. या वाळूच्या पैशाने एक पिढी बरबाद करून सामाजिक वातावरण दूषित केले गेले. माफीया राजच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात पैसा येऊन मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू होता. त्यामुळे येथून पुढे कुठली ही माफियागिरी कदापी चालू देणार नसल्याचा इशारा अहमदनगर दक्षिणचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहित्याचे वाटप खा. डॉ सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपचे संग मनेर तालुकाध्यक्ष सतीश कानवडे डॉ. अशोक इथापे वसंतराव देशमुख ,रोहीदास डेरे ,डॉ. सोमनाथ कानवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फक्त वेळ वाया घालविण्याचे काम झाले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने उतर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला निळवंडे कालव्यांच्या कामांना ५ वी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे आता जिरायती भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.