नगर : तुकाई योजना का बंद ठेवली? आमदार प्रा. राम शिंदे | पुढारी

नगर : तुकाई योजना का बंद ठेवली? आमदार प्रा. राम शिंदे

कर्जत/कोंभळी : पुढारी वृत्तसेवा :  तीन वर्षे झाले बील आडवून धरलं, परवानगी आडवून धरली, महाविकास आघाडी सरकार व लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक खोडा घातला. परत ते म्हणतात राज्यात एक नंबरचा पथदर्शी प्रकल्प आहे. याच्यात राजकारण आणि आडमुठेपणा कोणी करू नये, पण तीन वर्षे कोणी आडमुठेपणा केलाय? तुम्हीच सांगा, असा सवाल करत आमदार प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचे चांगलेच वाभाडे काढले.  आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली तुकाई उपसा सिंचन योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद ठेवण्यात आली होती.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आमदार प्रा. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला पुन्हा गती आली आहे. योजनेसाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. सोमवारी (दि.13) खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासह लाभक्षेत्रातील नागरिक, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील वालवड येथे या योजनेच्या कामास पुन्हा सुरुवात झाली. आमदार राम शिंदे म्हणाले, तीन वर्षे म्हणले परवानग्याच नाहीत, अशीच चालू केली, फलानं झालं, अशीच चालू केली, परवानग्या नसताना 40 टक्के काम पूर्ण झाले. लोकांना माहित होते अन् अधिकार्‍यांना आणि प्रशासनाला माहित होते, राम शिंदे, काळजी करायचे कारण नाही, म्हणून योजनेचे 40 टक्के काम पूर्ण झाले.

पण गेल्या तीन वर्षे जाणीवपूर्वक तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आमदार रोहित पवारांनी अन्याय केला. ठेकेदाराचं बील दिल नाही, योजनेचं काम बंद ठेवलं, परवानग्या मिळू दिल्या नाही; परंतु आपलं सरकार आलं आणि एका फोनवर सगळ्या परवानग्या मिळवल्या. आता, योजनेचे पाणी पडेपर्यंत काम बंद होणार नाही. निधीची काळजी करू नका, तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही.

आमदार शिंदे म्हणाले, तुकाई सिंचन योजना कसल्याही परिस्थितीत बंद होणार नाही, या योजनेचे काम सुरू असताना कोणाच्या शेतातून, बांधावरून जात असेल तर सहकार्य करा, ठेकेदाराला अधिकार्‍याला सहकार्य करा, ही काय रिलायन्सवाल्याची पाईपलाईन नाही, त्यामुळे काहीही अपेक्षा करू नका, ही आपल्या पाण्याची योजना आहे, त्यामुळे कोणीही काहीही आशाला लागू नका आणि काही मिळणारही नाही. काम आपल्याला पूर्ण करून दावायचयं, कोणी काहीही अफवा सोडीन, कोणी काहीही श्रेय घेईन, कोणाला काय श्रेय घ्यायचे ते घेऊ द्या, मी सहा वर्षाचा आमदार झालोय,

योग्य वेळी योग्य काम दावणार आहे. त्याचे मला जजमेंट आलंय, मला ही सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात, त्यामुळे आपले काम तुमच्यासाठी सुरूया. कोणीही आडवाआडवी करू नका, असे अवाहन आमदार शिंदे यांनी केले. तुकाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीनंतर कामाचा नारळही फोडला होता. परंतु, ऐन निवडणुकीच्या काळात ही योजना टीकेचं लक्ष झाली, तुकाई योजना ज्या 19 गावांमधून जाते त्या गावांमधील एक गाव वगळता अन्य 18 गावांमध्ये मी 2019च्या विधानसभेमध्ये मागे आहे. आपचे सरकार पण गेले, मी तुकाई चारी मंजुर करून देखील मला मतदान कमी पडेले, मग प्रश्न उपस्थित होतो, तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम बंद का राहिलं? पण ज्यांनी कामं केले, ज्यांनी सर्व राजकीय प्रतिष्ठा, मंत्रिपदाची प्रतिष्ठा पणाला लावली, वेळेत, कालमर्यादेत काम मंजूर केलं, त्याला काहीच आशीर्वाद, सहकार्य न देता अश्या पध्दतीचं काम केलं, असे म्हणत आमदार शिंदे यांनी खंत बोलून दाखवली.

‘तुकाई चारीचा नाद मिटवायसाठीच आलोय’
22 गावांचा प्रश्न सोडवल्याचं मला मानसिक समाधान आहे. मी अतिशय समाधानी, पण मीबी काय कमी नाही, मागच्या दाराने आलोच, तुकाई चारीचा नाद मिटवायसाठीच आलोय, आल्याबरोबर तुकाई चारीला मंजुरी घेतली, एकाच फोननं मंजुरी दिली. एकाच फोनवर, मी तर सत्ताधारी पक्षाचा मागच्या दाराचा आमदार, तुम्ही सांगता ना आमचं सरकार व्हतं, मग ते विकास काम आडवायसाठी होतं का? त्यामुळं माणूस आपला तो आपलाच असतो हे ध्यानात ठेवा, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी पुन्हा भावनिक साद घातली.

‘बंद झाला का नाही तसला खेळ’
म्हणतात गडी मागच्या दाराने आला, त्याचं काय आयकायचं, गडी मागच्या दाराने जरी आला, तरी काम पुढच्या दाराचं करतोय, आपली कामे ही म्हणले आम्हीच आणली, आढळगाव ते जामखेड, अहमदनगर- सोलापूर दोन हजार कोटी आम्हीच आणलं, ‘बोलायचाच भात अन् बोलाचीच कढी’, वॉटसअप अन् फेसबुक रेटून चलायचं, आता मी आमदार झाल्यापासून कोणाला व्हाईस कॉल आलाय का? बंद झाला का नाही तसला खेळ, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला.

Back to top button