नगर : बाहेरच्या पालकमंत्र्यांमुळे विकास आराखडा नाही : ना. राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

नगर : बाहेरच्या पालकमंत्र्यांमुळे विकास आराखडा नाही : ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याकडे आजपर्यंत फक्त राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने बदलविण्याचा आपला प्रयत्न आहे, असे सांगत पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी हा जिल्हा आता सर्वांना साद घालत आहे. माध्यमांनीसुध्दा या विकास प्रक्रीयेत सहभागी होवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्या वतीने माध्यम प्रतिनिधींशी स्नेह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री विखे यांनी सविस्तर भाष्य करुन, जिल्ह्याच्या तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यातील बाबींचे विवेचन केले.

यावेळी खा. डॉ.सुजय विखे पा., शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, पद्मश्री विखे पा. कारखाना माजी चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे, भगवती माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खर्डे, बाजार समिती माजी उपसभापती बाळासाहेब जपे उपस्थित होते.
भौगोलिकदृट्या जिल्हा मोठा असला तरी प्रत्येक तालुक्यात असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करुन, विकासात्मक प्रक्रीया साध्य होवू शकते, यासाठीच आपला प्रयत्न आहे. विकास आराखड्याबाबत सर्वांच्याच अभ्यासपुर्ण सुचना मागवित असून, त्यानुसार जिल्हा विकासाचे नियोजन परिपुर्ण होवू शकेल, असा विश्वास व्यक्त करीत मंत्री विखे म्हणाले, औद्योगिक वसाहतींमधील समस्यांचे गांभिर्य मोठे असले तरी, यामध्ये सुधारणेला वाव आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने सर्व उद्योजकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी यानिमित्ताने प्रयत्न होतील. राज्य व राष्ट्रीय महामार्ग आता निर्माण होत असल्यामुळे दळण-वळण सोयीस्कर होत आहे. उपलब्ध जमिनींवर स्वतंत्र आयटीपार्क, कृषी प्रक्रीया उद्योग उभारल्यास, या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होवू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तिर्थस्थाने आहेत. तिर्थक्षेत्र पर्यटन हासुध्दा विकासाच्या प्रक्रीयेचा एक भाग होवू शकतो. जिल्ह्यात श्रध्दा स्थानांकडे येणार्‍या भाविकांची संख्या पाहता तिर्थक्षेत्रांच्या विकासाचे नियोजन झाले तर, या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळून स्थैर्यही मिळू शकते, याकडे लक्ष वेधून अकोले तालुक्यात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्येने ट्रेकर येतात. या भागातही रोजगार उपलब्धतेच्या मोठ्या संधी आहेत, परंतु तेथील तरुणांनी पुढे येवून या विकास प्रक्रीयेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकार सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा विकासाच्या नियोजनात सर्वांचे सहकार्य लागणार आहे. कारण आत्तापर्यंत जिल्ह्याकडे राजकीय दृटीकोनातूनच पाहिले गेले. जिल्ह्यातला माणूस पालकमंत्री होवू नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. त्यामुळे विकासाच्या चर्चा झाल्या नाहीत, परंतु ही परिस्थिती बदलविण्यासाठी आता सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करायचे आहेत, असेही मंत्री विखे म्हणाले.
सूत्रसंचलन प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर यांनी केले.

.. तर विकासाचा नवा प्लॅटफॉर्म

जिल्ह्यातील अनेक भूमीपुत्र देशासह परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा विकासासाठी नवीन काय करता येईल, अशा सूचना त्यांच्याकडून मागवत आहोत. हे सर्व भूमीपुत्र एकत्र आल्यास विकासाचा नवा प्लॅटफॉर्म तयार होऊ शकेल. विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमांची भूमिका आमच्यादृष्टीने मत्त्वपूर्ण आहे. यासाठी विकास प्रक्रियेचे भागीदार व्हा, अशी इच्छा मंत्री विखे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात धर्मांतर, लव्ह जिहाद गंभीर : खा. विखे

खा. डॉ.सुजय विखे पा. पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, पालकमंत्री पद आता नगर जिल्ह्याकडे आल्याने प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची मोठी संधी मिळाली आहे, तसे प्रयत्नही सुरु झाले आहेत, परंतु सामाजिक जबाबदार्‍याही वाढत आहेत, याकडे लक्ष वेधून जिल्ह्यामध्ये धर्मांतर व लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य माध्यमांनी ओळखून याबाबत जागृती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button