राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण : राज ठाकरेंचा आरोप
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीच राजकारण सुरू झाले आहे. शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. त्यांची जुनी भाषणे काढून बघा. महाराष्ट्रात १९९९ पासून विष पेरले गेले, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी राज ठाकरे म्हणाले, “महापुरूषांची जात काढणं ही काहींची राजकीय गरज आहे. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेच आहे. इतिहासकार तर्क मांडून इतिहास रचत असतात. सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय इतिहास दाखवू शकत नाही. शिवरायांच्या इतिहासाला धक्का लावणारा अजून जन्माला यायचा आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीच राजकारण सुरू झाले. शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. त्यांची जुनी भाषणे काढून बघा. त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांना याबाबत विचारले होते, यावेळी ते म्हणाले होते, शाहू, फुले, आंबेडकर एक विचार आहे. मग शिवाजी महाराजांचा विचार नव्हता का? मूळ विचार हा शिवरायांचा आहे; पण शिवरायांचे नाव घेतले की मुस्लीम मते जातात. फंडीग करून टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचे राजकारण करून घ्यायचे. इतर समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये फूट कशी पाडता येईल, त्यासाठी प्रयत्न करायचा. महाराष्ट्रात हे विष १९९९ पासून पेरले गेले, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
हेही वाचा :
- Sanjay Raut : राज्यपाल व मंत्र्यांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची चढाओढ – संजय राऊत
- गोवा : पार्ट्यांवर नियंत्रण? रात्री १० नंतर ‘नो स्पिकर’; ध्वनी प्रदूषणावर उच्च न्यायालयाचा चाप
- Jadeja shares video : रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ,” नरेंद्र मोदी गया, गुजरात गया…”