Cyclone Sitrang : 'सितरंग' चक्रीवादळाने बांगलादेशात ९ जणांचा मृत्यू; 'या' राज्यांना रेड अलर्ट जारी
पुढारी ऑनलाईन: ‘सितरंग’ चक्रीवादळ मंगळवारी बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. यामध्ये आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामधून हजारो लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या चक्रीवादळने किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. बंगालच्या किनारपट्टीवरील घरे उद्ध्वस्त झाली असून, यामध्ये झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे रस्ते, वीज आणि दळणवळणासारखी संपर्क साधनेदेखील विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात उठलेले ‘सितारंग’ चक्रीवादळ हे सोमवारी सागर बेटापासून २६० किमी आग्नेयला (दक्षिण-पूर्व किनारा) धडकले. त्यानंतर ते पुढे ते उत्तर-ईशान्य दिशेला सरकले आहे. त्यामुळे भारताच्या ईशान्येकडील चार राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने बंगाल किनारपट्टीवरील गावांना आणि ईशान्येकडील काही राज्यांना मुसळधार पावसाचा ईशारा दिला आहे. यामध्ये ईशान्यकडील आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोमवारी सकाळी हे चक्रीवादळ सागर बेटाच्या दक्षिणेस सुमारे ३८० किमी अंतरावर घोंघावत होते. दरम्यान, या वादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्रिपुरा, आसाम, मिझाराम, मणिपूर आणि नागालँड या राज्यांना देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँडमध्ये २६ ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्रिपुरा सरकारने २६ ऑक्टोबरला सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.