अर्थकारण : विस्तारलेले आकाशपक्षी! | पुढारी

अर्थकारण : विस्तारलेले आकाशपक्षी!

ब्रिटन-व्हिटनी… एक ना दोन अशा अनेक तगड्या कंपन्या यात होत्या. भारतामध्ये एअरबस 350 हे विमान आजवर उड्डाणासाठी वापरले गेले नव्हते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला एअरबस कंपनीने या विमानाचे मुंबई-दिल्ली हे उड्डाण केले आणि एअर इंडियातील वैमानिकांना ए 350 या विमानाच्या उड्डाणाचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची सूचना मिळाली. माध्यमांमध्ये टाटा उद्योगसमूह विमाने खरेदी करत आहे, अशी बातमी लिक झाली. तरीदेखील एकूण किती विमाने खरेदी केली जातील याचा कोणालाही अंदाज नव्हता.

डबलिनमध्ये एका लिझिंग कॉन्फरन्समध्ये ‘एअर लीज’ कंपनीच्या प्रमुखांनी टाटा उद्योगसमूह तब्बल 500 विमाने खरेदी करत आहे, असा गौप्यस्फोट केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. टाटा उद्योग समूहासाठी कंपन्या विकत घेणे, आपल्यात समाविष्ट करून घेणे हे काही नवे नाही. या आधी ‘टेटली’ ही चहा कंपनी आणि ‘जग्वार’ ही चारचाकी कंपनी टाटा उद्योगात समाविष्ट झाली होती. परंतु ही ऑर्डर इतकी मोठी असेल याचा कोणालाही अंदाज नव्हता. दिवाळीपासून या उलाढालीशी संबंधित प्रत्येक बाब अत्यंत नियोजनपूर्वक आणि गांभीर्याने चर्चेला आली, तपासली गेली. त्यावर काटेकोर चर्चा झाली.

विमान खरेदीची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असते. ती समाधानकारकरित्या पूर्ण करून 14 फेब्रुवारी या दिवशी एअरबस या कंपनीकडून 250 विमाने आणि बोईंग या कंपनीकडून 190 विमाने खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आणि एका क्षणात एअर इंडियाकडे, टाटा उद्योग समूहाकडे आणि भारताकडे पाहायचा जगाचा द़ृष्टिकोनच बदलला. अर्थातच यात वाईड बॉडी, नॅरो बॉडी अशा अनेक प्रकारच्या विमानांची खरेदी होणार आहे. त्यामुळे प्रवासी हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांती घडणार आहे, यात शंकाच नाही. इतकी मोठी ऑर्डर असल्यामुळे त्यावर सवलतदेखील तितकीच घसघशीत आणि विमान बनवणार्‍या कंपनीला आणि त्या देशाला मोठा आर्थिक फायदा होणार, यात शंकाच नाही म्हणून या तिन्ही प्रगत देशांतील प्रमुखांनी भारताचे आभार मानले.

टाटा उद्योग समूहाकडे आज ‘विस्तारा’ आणि ‘एअर इंडिया’ ही संपूर्ण सेवा देणारी कंपनी तसेच एअर इंडिया एक्स्प्रेस, एअर आशिया या कमी किमतीत चालणार्‍या कंपन्या अशी विविधता आहे. येत्या काळात या उद्योग समूहातील विविध हवाई वाहतुकीचे नियोजन करून सुटसुटीतपणा येईल. एअरबस आणि बोईंग या दोन कंपन्यांमध्ये ऑर्डर विभागून देण्याचे कारण म्हणजे कोणा एकावरचे अवलंबित्व टाळणे आणि दुसरे म्हणजे कोणा एकाकडे एवढी विमान विविधता नव्हती. हे सगळे थक्क करणारे आहे. ‘एअर इंडिया’मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन बदलाचे वारे वाहत आहेत. उत्पादकता आणि ग्राहकभिमुखता याला प्राधान्य मिळत आहे. दर आठवड्याला विमान प्रवास करणार्‍या असंख्य प्रवाशांना या बदललेल्या व्यवस्थापनाचा अनुभव येत आहे. शेवटी कर्मचारी तेच! विमानही तेच! पण व्यवस्थापन, कार्यसंस्कृती आणि माणसांच्या अंत:प्रेरणांना हाक दिली की काय घडते, त्याचे हे दर्शन आहे.

खरे तर मुंबई हे पश्चिमी देश आणि पूर्वकडील देश यांना जोडणारा दुवा बनू शकते. नेमके हेच ओळखून टाटांनी हे धाडस केले असावे. युक्रेन-रशिया युद्धानंतर एअर इंडियाने युरोप आणि अमेरिकेच्या विमान फेर्‍या वाढवून संधीचा फायदा कसा उठवता येतो हे दाखवून दिले. टाटांनी नोंदवलेल्या ऑर्डरएवढी मोठी ऑर्डर वाहतूक क्षेत्रात यापूर्वी क्वचितच नोंदवली गेली असेल. या वर्षाच्या अखेरीपासून ही नवी विमाने भारतात यायला सुरुवात होईल. त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असणार आहे. एअरबस या कंपनीची विमान बनवण्याची क्षमता दरमहा 65 एवढी आहे. त्यांच्याकडे आजच विविध देशांमधील सात हजार विमानांच्या ऑर्डर आहेत. त्यामुळे डिलिव्हरीसाठी वेळ पाळणे हे एक आव्हानच आहे. या आधी अशा प्रकारच्या भव्य दिव्य ऑर्डर्स ‘एमिरेट’ या कंपनीने दिल्या होत्या. आता आकाशातील अमिरात बनण्याचा मान टाटाच्या महाराजाला मिळाला, हे महत्त्वाचे.

हे सर्व शक्य झाले ते देशातील बदललेल्या वातावरणामुळे. बदललेल्या हवाई वाहतूक धोरणामुळे. सरकार या क्षेत्रातून बाहेर पडले ते उत्तमच झाले. कारण ही झेप सरकारी बाबूंना परवडणारी नव्हती. आता एवढी विमाने येणार म्हणजे विमानतळाच्या क्षमता वाढणार, विमानतळ वाढणार. दिल्लीहून विमान उड्डाण करताना दिसणारे तिथे सुरू असलेल्या चौथ्या उड्डाणपट्टीचे काम नजरेत भरणारे आहे. दिल्लीत आणि मुंबईत दुसर्‍या विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. अनेक राज्यांमध्ये छोटी विमानतळे विकसित होत आहेत. याचाच अर्थ, प्रवासी संख्यादेखील अनेक पटींनी वाढणार.

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणसाला विमान वाहतूक परवडेल, असे सुतोवाच केले होते. ‘इंडिगो’ या कंपनीने या आधीच विमानांची अशी मोठी ऑर्डर नोंदवली आहे. दिवंगत उद्योजक राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एअरलाईन्स’ने 72 विमाने खरेदी करण्याची तयारी केली आहे. प्रवासी विमान वाहतुकीचे क्षेत्र विस्तारत आहे. त्यात प्रचंड स्पर्धा आणि संधी आहे. प्रवासी विमान वाहतूक सोपी नाही. मुंबई-दिल्ली विमान संपूर्णपणे प्रवाशांनी भरून उड्डाण केले जाते.

रुपया आणि डॉलरचे भाव स्थिर असतात. विमान इंधनाच्या किमती स्थिर असतात आणि उतरताना विमानाला घिरट्या घालाव्या लागल्या नाहीत तर विमान वाहतूक कंपनीला जेमतेम तीन ते चार पैसे दर प्रवासी, दर किलोमीटर फायदा होत असतो. यावरून विमान वाहतूक व्यवस्था चालवणे किती जिकिरीचे आहे, हे लक्षात येईल. दर आठवड्याला ‘एअर इंडिया’ इंग्लंडसाठी 47 विमानांचे उड्डाण करते, तर ‘एमिरेट’ ही आखाती देशातील कंपनी इंग्लंडसाठी शंभरहून अधिक उड्डाण करते. संधी प्रचंड मोठी आहे. फक्त चालवायची द़ृष्टी, हिंमत आणि देशातील धोरण सकारात्मक हवे.

या सगळ्यामुळे भारतात नोकर्‍यांच्या संधी वाढणार. इथले इन्फ्रान्स्ट्रक्चर सुधारत आहे. लोकांचा द़ृष्टिकोन विस्तारत आहे. स्वप्नांचे आकाश बदलत आहे. या ऑर्डरच्या निमित्ताने एका नव्या भारताच्या उदयाची नांदी होत आहे.

उदय निरगुडकर

Back to top button