Travel Insurance | प्रवासी विमा का गरजेचा? जाणून घ्या अधिक | पुढारी

Travel Insurance | प्रवासी विमा का गरजेचा? जाणून घ्या अधिक

विमा

परदेश दौरा चिंतामुक्त राहण्यासाठी प्रवासी विमा (Travel Insurance) योजना खरेदी करणे हा एक चांगला निर्णय राहू शकतो. ही योजना देशातील अनेक विमा कंपन्यांकडून प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाते. यात वैद्यकीय विमा किमान 50 हजार अमेरिकी डॉलर ते 5 लाख अमेरिकी डॉलरपर्यंत कवच देणारे आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, व्यावसायिक दौरा असेल तर त्यानुसारही योजना असतात.

कुटुंबासाठी दोन श्रेणीत विमा (Travel Insurance) असतो. एक स्टँडर्ड आणि गोल्ड. विम्यात कोणत्या गोष्टींला कवच दिले जाते, त्याची यादीच प्रवाशाला सादर केली जाते. काहीवेळा विमान कंपन्या स्वत:च प्रवाशांचा विमा उतरवतात. तिकिटात ती रक्कम जोडलेली असते. काही वेळा व्यक्तिश: विमा काढता येतो. युरोप, अमेरिका या खंडांनुसार विम्याचे प्रकार असून, त्याचे कवच मात्र कमी जास्त प्रमाणात राहते.

भारतीय नागरिक विविध कारणाने पर- देशात जात असून; त्यात शिक्षण, नोकरी, अवकाश, आरोग्य, डेस्टिनेशन वेडिंग यांसारखी काही कारणे आहेत. परदेश प्रवासाची आकडेवारी सकारात्मक चित्र दर्शविणारी आहे. अचानक येणार्‍या संकटामागची कारणे कोणतीही असली तरी त्यापासून बचाव करण्यासाठी प्रवाशांनी प्रवास विमा उतरवणे आवश्यक आहे. या विमा योजनांमुळे प्रवाशाला मिळणार्‍या लाभाची माहिती घेऊ.

आरोग्य आणीबाणी : भारताच्या तुलनेत पर- देशात उपचाराचा खर्च खूप अधिक आहे. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही आणि खिशालाही झेपणारा नाही. प्रवासात किंवा पर्यटनाच्या काळात आरोग्य आणीबाणी निर्माण झाली, तर त्यापोटी होणार्‍या खर्चाला विमा संरक्षण देण्याचे काम या योजना करतात. विशिष्ट परिस्थितीत निर्माण होणार्‍या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि कोणत्याही अडथळ्याविना उपचार करण्यासाठी विमा हा महत्त्वाचा ठरतो.

बॅग हरविल्यास किंवा नुकसान झाल्यास…

परदेशातील प्रवास हा किमान दहा दिवस ते कमाल तीन ते सहा महिन्यांचा राहू शकतो. साहजिकच प्रवाशांच्या सामानांची संख्यादेखील अधिक राहते. मात्र एअरलाइन्सकडून सामान ठेवताना, मानवी चुकांमुळे किंवा चोरी झाल्यास सामानाचे नुकसान होऊ शकते. सामानात मौल्यवान वस्तू असू शकतात. लॅपटॉप, दागिने, एटीएम कार्ड आदींचा समावेश राहू शकतो. अशा वेळी विमा असल्यास त्याची भरपाई मिळते. अर्थात एअरलाइन्सच्या निकषांनुसार ठराविक वजनातच सामानाचे वहन करता येते.

फ्लाईट रद्द होणे किंवा विलंब होणे : अनेक मंडळी आपल्या प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात. विमान कंपन्यांची सेवा, जेवणाचा दर्जा, वागणूक आदींबाबत फीडबॅक देत असतात. एखादेवेळी काही अडचणींमुळे विमानाचे उड्डाण रद्द होते किंवा विलंबही होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. विमानतळावर दीर्घकाळ थांबावे लागते. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी प्रवास विमा असेल तर त्यानुसार प्रवाशांना सुविधा दिल्या जातात.
पारपत्र हरवणे : पासपोर्ट म्हणजेच पारपत्र हरविणे ही एक मोठी डोकेदुखी राहू शकते. प्रवासादरम्यान अशा प्रकारचा अनुभव येऊ शकतो. याप्रकरणी पोलिस ठाण्याकडे तक्रार करावी लागते. दूतावासाकडे पासपोर्टसाठी पुन्हा अर्ज करावा लागतो. आपत्कालीन प्रवासासाठी कागदपत्रे मिळवण्यासाठी बराच काथ्याकूट करावा लागतो. मात्र प्रवास विमा असेल तर या प्रक्रियेसंबंधीची कटकट शक्यतो सहन करावी लागत नाही. विमा प्रतिनिधी, अधिकारी हे संबंधिताच्या कामात मदत करून प्रवास सुखकर करतात.

हेही वाचा : 

Back to top button