शिरूर : वढू बुद्रुकमध्ये तब्बल २५ एकर ऊस जळून खाक | पुढारी

शिरूर : वढू बुद्रुकमध्ये तब्बल २५ एकर ऊस जळून खाक

कोरेगाव भीमा, पुढारी वृत्तसेवा

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वढू बुद्रुक गावातील आखरपाटी मळा येथे सोमवारी (दि. १०) दुपारी विद्युत शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या फडाला आग लागली. उन्हाची तीव्रता आणि आगीची धग यामुळे शेतकऱ्यांना आग नियंत्रणात आणणे मुश्कील झाले होते.

या घटनेची माहिती पीएमआरडीएच्या वाघोलीतील अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने काही अंतरावरील ऊस तोडून जागा मोकळी केली होती. त्यानंतर काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

या आगीमध्ये सुमारे २५ एकर ऊस जळाला असून संभाजी भंडारे, वसंत आरगडे, संतोष बोराटे, निखिल केदारी, खंडू शिवले, पिंटू शिवले, प्रकाश शिवले, मधुकर शिवले, विश्वास शिवले, भगवान शिवले या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीला महावितरण जबाबदार

ऊसाला लागलेल्या आगीमध्ये पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार असून, संबंधित ठिकाणाहून विद्युत प्रवाहाची मुख्य लाईन गेलेली आहे. शिवाय या लाईनवरील तारा खुप खाली आल्या आहेत. या ठिकाणी वारंवार वीजेच्या ठिणग्या पडत असल्याची कल्पनाही शेतकऱ्यांनी महावितरणला दिली होती. मात्र महावितरणणे त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button