महाराष्ट्रातून वृद्धाश्रमे हद्दपार झाली पाहिजेत : किर्तनकार इंदोरीकर महाराज
जिंतुर (परभणी) ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातून वृद्धाश्रमे हद्दपार झाली पाहिजेत, असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले. जिंतुर तालुक्यातील इटोली येथे कै. संजय हरिभाऊ केंद्रे यांच्या १० व्या पुण्यस्मणार्थ किर्तन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
३ डिसेंबर ते १० डिसेंबर या सप्ताहात श्री. हभप रामराव महाराज ढोक यांची श्री. रामकथा व ज्ञानयज्ञ सोहळा तसेच नामवंत किर्तनकारांचे किर्तने आयोजित करण्यात आलेली होती. याच दरम्यान सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर यांचे रविवारी (दि.५) रोजी सायंकाळी इटोली येथे किर्तन सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनवर आधारीत अंसख्य उदाहरणे देवून उपस्थित जनसमुदयास प्रेरणादायी संदेश देत किर्तनातून जनजागृती केली.
यावेळी त्यांनी असेही सांगितले की, आपला शेतकरी राजा सुखी जगलाच पाहिजे. आता शेती सेंद्रीय पद्धतीने करावी, शेतीस जोड धंदा असलाच पाहिजे, शेतकऱ्यांनी शेतात शेततळे, ठिंबक सिंचन पद्धती राबवावी, आपली शेती उत्पादने आपणच विक्री करून आर्थिक स्थिती मजबूत करावी. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. शिवरायाने अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यासाठी घेतलेली शपथ ही जगातील पहिली क्रांती असल्याचे सांगत आपला धर्म टिकला पाहिजे. माणूस टिकला नाही तरी चालेल, पण धर्म टिकला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
यापुढे त्यांनी रामकथा सप्ताह ठेवून मनीषाताई केंद्रे यांनी आपला धर्म टिकवला असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले. तर तरुणाईने व्यसनाधीन होऊ नये, असे आवाहन करत जनजागृती केली. अद्यापतरी शेतकऱ्यांनी आपले आईवडील वृद्धाश्रमात ठेवले नाहीत यासाठी समाधन व्यक्त करत महाराष्ट्रातून वृद्धाश्रमे हद्दपार झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागात होत असलेल्या लग्न समारंभात होणाऱ्या खर्चावर त्यांनी टीका करत मुलीच्या आई-वडिलांनी लग्न साध्या पद्धतीने किंवा सामूहिक विवाह सोहळे करण्याचे आवाहन केले. यामुळे अवांतर खर्च करून कर्जबाजारी होऊ नये असे त्यांनी या किर्तनातून प्रबोधन केले.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. किर्तनापूर्वी कौटुंबिक फुगडीने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. व श्रोत्यांनी भरभरुन साथ दिली. मंचावर हरिभाऊ केंद्रे, सौ. शकुंतला हरिभाऊ केंद्रे, इंजि. मंगेश हरिभाऊ केंद्रे, प्रसाद बुधवंत, गणेश ईलग, मुरली मते, सुधाकर नागरे, आदिंची उपस्थिती होती.
हेही वाचलंत का?