सामान्य डब्यातील रेल्वे प्रवाशांसाठी २० रुपयांत जेवण ! | पुढारी

सामान्य डब्यातील रेल्वे प्रवाशांसाठी २० रुपयांत जेवण !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मेल-एक्स्प्रेसच्या सामान्य कोचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने किफायतशीर दरात ‘जन आहार’ भोजनाची व्यवस्था केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि प्रमुख टर्मिनसवर ‘जन आहार’ भोजनाचे काऊंटर सुरू केले आहेत. यातून प्रवाशांना २० आणि ५० रुपयांचे जेवणाचे पॅकेट दिले जात आहेत. यामुळे खासगी विक्रेत्यांकडून भरमसाट किमतीत देण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आता रेल्वेतून हद्दपार होतील.
उन्हाळी हंगाम सुरू झाल्याने मेल-एक्स्प्रेसना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यातही किफायतशीर प्रवास म्हणून या एक्स्प्रेसच्या सामान्य कोचमधून प्रवास करण्याला सामान्य प्रवाशांकडून पसंती दिली जाते. या प्रवाशांना किफायतशीर दरात चांगले जेवण मिळावे यासाठी रेल्वेने भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनसोबत (आयआरसीटीसी) भागीदारीत जन आहार योजना सुरू केली आहे.
जन आहार दोन प्रकारांमध्ये देण्यात येत आहे. इकॉनॉमी जेवण २० रुपये, तर फराळाच्या जेवणाकरिता ५० रुपये दर आकारण्यात येतो. फलाटावर जेथे सामान्य डबा थांबतो, त्याठिकाणी हे काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी ही सेवा ५१ स्थानकांवर देण्यात आली होती. यंदा देशातील १०० पेक्षा अधिक स्थानकांवर १५० काऊंटर उघडले आहेत.
२० रुपयांत ७ पुरी (१७५ ग्रॅम), बटाट्याची सुकी भाजी (१५० ग्रॅम), लोणचे (१२ ग्रॅम)
५० रुपयांत राजमा-छोले चावल/खिचडी/कुलचे- भटुरे छोले/पाव भाजी/मसाला डोसा ३ रुपयांत १ ग्लास (२०० मिली) पाणी.
मध्य रेल्वे- इगतपुरी, कर्जत, मनमाड, खांडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्दुवाडी
पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, भरूच, वडोदरा आणि चित्तौडगड स्थानक

Back to top button