Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन | पुढारी

Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुक २०२४ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांचा आज (दि.१५) अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

गांधी मैदान, महाद्वार रोड, शिवाजी चौक, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप या महामार्गावर महायुतीची रॅली काढण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  ‘अब की बार चारसो पार’चा नारा देत नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना पाठबळ देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. (Lok Sabha Election 2024)

महायुतीच्या शिलेदारांना निवडूण द्या : मुख्यमंत्री

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज आज (दि.१५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत भरण्यात आले. “मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या महायुतीच्या शिलेदारांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

काँग्रेसला धडा शिकवा

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “५०- ६० वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते १० वर्षात पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या देशात कोणी उपाशी राहू नये यासाठी निर्णय घेणाऱ्या पंतप्रधानांच्या पाठीशी आपण उभे राहायचा आहे. काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा जाहीर केला पाहीजे. त्यांनी देशाला खड्ड्यात घातलं, देशाला अधोगतीकडे नेलं. काँग्रेसला धडा शिकवा. पंतप्रधान मोदींमुळे देशाच्या अर्धव्यवस्थेला चालना मिळाली. हे सरकार विकासाला महत्व देणार आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मतं म्हणजे देशाच्या विकासाला मतं आहे. आपलं मत मोदींना जाणार आहे. मोदींचे हात बळकट करायचे आहेत. ही रयतेची निवणूक आहे, जनता महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

 

Back to top button