कोल्हापूर : मंडलिक व माने हेच उमेदवार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर अणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना बदलणार नाही. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा प्रचार करा आणि त्यांना निवडून आणा. नेत्यांनी व कार्यकर्त्यांना जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशा शब्दांत मंडलिक व माने यांच्याबद्दल चर्चा आता बंद करा आणि त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केल्यानंतरही आवाडे आपल्या भूमिकेवर कायम असल्याने मुख्यमंत्र्यानीही ठाम भूमिका घेत कोणाच्या दबावाने उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारच्या कोल्हापूर दौर्यात दुपारी चार वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत आपल्या पक्षाचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यासाठी जोडण्या लावल्या. नियोजित दौर्यात बदल करत मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्याचे त्यांच्या दौर्यातून स्पष्ट झाले आहे.
भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या ताराराणी पक्षातर्फे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे; मात्र जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. येथून त्यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे; मात्र भाजपच्या सहयोगी आमदारानेच बंडाचा झेंडा फडकविण्याचे आव्हान दिल्याने महायुतीच्या ऐक्याला तडा गेला आहे. त्याचे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
बंडाची आणि तक्रारींच्या पाढ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना निवडून आणणे एवढेच नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. त्यामुळे कोण काय करतो, याकडे लक्ष न देता सगळ्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयावर लक्ष केंद्रित करा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नेते व कार्यर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्याशी सविस्तर चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते शंभूराज देसाई, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. वारणानगर येथे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा केली.