Goa Lok Sabha Elections : २५ वर्षांनंतर श्रीपाद नाईक- रमांकात खलप आमने-सामने; कोण बाजी मारणार ?  | पुढारी

Goa Lok Sabha Elections : २५ वर्षांनंतर श्रीपाद नाईक- रमांकात खलप आमने-सामने; कोण बाजी मारणार ? 

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी:
गोव्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व अ‍ॅड. रमांकात खलप हे तब्बल 25 वर्षानंतर समोरासमोर उभे ठाकले आहेत. उत्तर गोवा लोकसभेसाठी त्यांच्यात लढत रंगणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही नेत्यांची ही शेवटची लोकसभा निवडणूक असून 25 वर्षापूर्वी नाईक यांच्याकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा अ‍ॅड. खलप काढतात का ? हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. Goa Lok Sabha Elections

1999 मध्ये नाईक यांना भाजपची पहिल्यांदाच उमेदवार मिळाली होती. श्रीपाद नाईक व त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिपद भूषवलेले काँग्रेस उमेदवारीवर लढलेले अ‍ॅड. रमाकांत खलप यांच्यात 1999 साली लोकसभा निवडणुकीत लढत झाली होती. या निवडणुकीत नाईक यांना 1 लाख 04 हजार 958 (54.96 टक्के) मते मिळाली होती. तर अ‍ॅड. खलप यांना 68 हजार 237 मते प्राप्त झाली होती. नाईक यांनी खलप यांचा 36 हजार 721 मतांनी पराभव केला होता. Goa Lok Sabha Elections

श्रीपाद नाईक सहाव्यांदा उत्तर गोवा जिंकण्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी अ‍ॅड. खलप यांना 1999 साली जशी मात दिली होती; तशी पुन्हा मात देतात का? की त्या पराभवाचा वचपा अ‍ॅड. खलप काढतात का, हे पहावे लागेल.

गोव्यात दोन्ही जागासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. दि. 12 ते 19 एप्रिल अर्ज भरण्याची तारीख आहे. अ‍ॅड. खलप यांनी मगोच्या उमेदवारीवर 1996 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकला होता. मात्र त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व 1999 ची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

श्रीपाद नाईक हे 1999 पासून सलग पाचवेळा निवडून आले असून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. हा बालेकिल्ला यावेळी अ‍ॅड. खलप हे आपल्या वयाच्या 77 व्या वर्षी जिंकतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Goa Lok Sabha Elections :  अ‍ॅड. खलप केंद्रीय कायदा मंंत्री

अ‍ॅड. खलप हे 1996 ते 1998 पर्यंत उत्तर गोव्याचे मगोचे खासदार होते. प्रथम तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड फ्रंट युती सरकारमध्ये आणि नंतर इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखाली एकूण जवळपास 18 महिने ते केंद्रीय कायदा मंत्री होते. अ‍ॅड. खलप हे 17 वर्षांच्या कालावधीनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2007 मध्ये ते मांद्रे मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते.

नाईक 12 वर्षे केंद्रात मंत्री

1999 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर, नाईक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दोन वर्षे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले. 2014 ते 2024 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी सलग दोन कार्यकाळ मंत्री म्हणून काम केले आहे. नाईक हे वित्त, नागरी उड्डयन, आयुष, संस्कृती आणि पर्यटन आणि बंदरे यासह विविध खात्यांचे केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button