Heat Wave : महाराष्ट्रासह ८ राज्यांत उष्णतेची लाट; काही राज्यांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.यापैकी बहुतांश राज्यांमध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसवर किंवा त्यापुढे पोहोचले आहे. उर्वरित उन्हाळ्यातही विक्रमी उष्णता होण्याची शक्यता आहे. ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट असताना भारतीय हवामान खात्याने राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मात्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश अशा डोंगराळ राज्यांमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे तर याच राज्यांमध्ये काही ठिकाणी आणखी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. Heat Wave
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ३३ जिल्ह्यांमध्ये गारांसह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर बिहारमधील २४ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ७ आणि ८ एप्रिलला दक्षिण बिहारसह छत्तीसगडच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्येही ९ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आाला आहे. तर हरियाणामध्ये ११ एप्रिलनंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. १२ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान हरियाणामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. Heat Wave
एका अभ्यासानुसार २०१४ ते २०२३ या कालावधीत देशातील नागपूर, अहमदाबाद, चेन्नई, पुणे आणि जयपूरसह ९ प्रमुख शहरांचा बहुतांश भाग उष्णतेच्या केंद्रांमध्ये बदलला आहे. उष्णतेची केंद्रे बनलेल्या या शहरांमध्ये मागील दहापैकी सलग सहा वर्षांपासून उन्हाळ्यात तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
हेही वाचा