झटपट वजन घटवताय?; शरीरावर हाेतात ‘हे’ दूरगामी परिणाम | पुढारी

झटपट वजन घटवताय?; शरीरावर हाेतात 'हे' दूरगामी परिणाम

डॉ. महेश बरामदे

‘दोन महिन्यांत अमूक किलो वजन कमी… नाही तर पैसे परत,’ अशा अनेक लुभावणार्‍या जाहिरातींचा मारा रात्रंदिवस आपल्यावर होत असतो. कधी-कधी त्याचा मोह पडतोही.

संबंधित बातम्या 

व्यायाम न करता, डायटिंग न करता वजन कमी होत असेल तर कुणाला नको आहे? कारण व्यायाम करून घाम गाळणं आणि तोंडावर लगाम ठेवणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. त्यापेक्षा दोन गोळ्या दिवसातून घेतल्या की वजन फटाफट उतरत असेल तर हा पर्याय अनेकांना पसंत असतो. त्यासाठी अवाजवी पैसे खर्च करायलाही मागे पुढे पाहिले जात नाही; पण अशा प्रकारे वजन कमी करून तुम्ही शरीरात अन्य रोगांना आमंत्रण तर देत नाही ना, याची एकदा खात्री करा.

कारण, अशाप्रकारे वजन कमी करण्याचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. त्यात पोट बिघडणे, गॅसेस, अ‍ॅसिडिटी अशा सामान्य लक्षणांपासून ते अगदी हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या विकारांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे गोळ्या किंवा अन्य प्रकारची औषधे घेऊन कमी केलेलं वजन दीर्घकाळापर्यंत टिकत नाही. ठरावीक काळाने ही औषधे घेणं कमी केलं की वजनही पूर्ववत येतं. त्यामुळे अशा प्रकारे वजन उतरवण्याआधी या दूरगामी परिणामांचा विचार अवश्य करा.

पचनाशी संबंधित विकार अशा प्रकारचे वजन कमी करणारे औषध घेतल्याने होण्याची शक्यता अधिक असते. या औषधांनी पोटाच्या आसपासची चरबी तर कमी होतेच, पण गॅसेस होणे, बद्धकोष्ठता किंवा अपचन असे विकार डोके वर काढायला सुरुवात करतात. त्याचबरोबर व्हिटामिनची कमतरताही जाणवू लागते. त्यामुळे या औषधांबरोबर मल्टिव्हिटामिन घेणंही श्रेयस्कर ठरतं.

अशी औषधं घेण्याचा आणखी एक परिणाम होतो तो भूक लागण्यावर. त्यामुळे खूप वेळ काही न खाण्याची इच्छा झाल्याने पोट रिकामे राहून काही विकार उद्भवतात. याचा परिणाम उच्च रक्तदाब निर्माण होण्यात होतो किंवा हृदयाच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होत असतो. भूक न लागल्याने झोप न येण्याची वृत्ती वाढते. त्यामुळे रक्तदाब वाढू लागतो. शिवाय रक्तात गाठी निर्माण होऊन ते एका जागी साठण्याची क्रियाही सुरू होते.

बराच काळ वजन कमी करण्याची औषधे घेतल्याने मूत्राशयावरही विपरीत परिणाम होतो. तो लगेच दिसून येत नाही, तर कालांतराने दिसतो; पण एकदा हा त्रास सुरू झाला की, त्यातून बाहेर पडणं अवघड असतं. किडनीवर प्रेशर आल्याने आतल्या आतड्यालाही इजा होते. तिथे ऑक्सेलिक आम्ल साठत राहते. काहीवेळा मूतखड्याचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. वजन कमी करण्याच्या या औषधांनी तुमच्या दिनचर्येवरही परिणाम होत असतो. सारखं आजारी असल्यासारखं वाटत राहतं. डोके दुखणे, पोटात गॅसेस होणे, पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता अगर घशाला सारखी कोरड पडणे हे आणखी काही साईड इफेक्ट होत असतात.

यातली कोणतीही लक्षणं दिसू लागली तर वजन कमी करण्यासाठी कोणते औषध घेत असाल तर ते ताबडतोब बंद केले पाहिजे; कारण या लक्षणांनी पुढची धोक्याची घंटा वाजवलेली असते. या औधषांनी आता कॅन्सरही होऊ शकतो, असाही निष्कर्ष पुढे आला आहे. या औधषांमुळे पॅनक्रियाजचा कॅन्सर होण्याची शक्यता सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त असते, असं दिसून आलं आहे.

Back to top button