‘उजनी’तील पाण्यासाठी उद्या रास्ता रोको | पुढारी

‘उजनी’तील पाण्यासाठी उद्या रास्ता रोको

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  उजनी धरणातून (यशवंत सागर) गरज नसताना सोडण्यात येत असलेले पाणी तातडीने बंद करून उजनी धरणाच्या वरच्या धरणातून प्रत्येकी दोनवेळा दहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यासह करमाळा, दौंड, कर्जत या तालुक्यांतील धरणग्रस्त 1 फेब—ुवारी रोजी भिगवण (ता. इंदापूर) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करणार आहेत. उजनी धरणग्रस्त समितीने तसा इशारा दिला आहे. यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच धरणातील पाण्याचा प्रश्न उग्र होण्याची शक्यता आहे. इंदापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत उजनी धरणग्रस्त समितीने आंदोलनाचा पवित्रा जाहीर केला. या वेळी महारुद्र पाटील, अंकुश पाडुळे, अरविंद जगताप, बाळासाहेब मोरे, अमोल मुळे, उदय भोईटे उपस्थित होते.

या वर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरणात नेहमीइतका पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातच धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडल्याने उजनी धरणाची पाणीपातळी वजा 4.92 टक्के इतकी झाली आहे. जानेवारी महिन्यात उजनीचा पाणीसाठा वजा होणे म्हणजे इंदापूर, दौंड, करमाळा उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागासाठी दुष्काळाची घंटा आहे. पाटबंधारे विभागाने जर पाण्याचे नियोजन केले असते तर एप्रिल महिन्यापर्यंत पाणी पुरवता आले असते, असे धरणग्रस्त समितीने सांगितले. यंदा उजनी धरण 60 टक्के मायनसमध्ये जाऊ शकते. धरणाच्या बॅकवॉटर भागातील शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून शेतीसाठी चार्‍या काढल्या आहेत. जर धरण 60 टक्के मायनसमध्ये गेले तर चार्‍या कोरड्या पडतील. धरणामधून शेतीसाठी आवर्तने देऊ नये, अशी विनंती समितीने केली होती. परंतु, पाटबंधारे विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी पाणी सोडले, असे समितीच्या नेत्यांनी सांगितले.

धरणग्रस्त समितीच्या मागण्या
अनावश्यकरीत्या चालू असलेले आवर्तन तत्काळ बंद करण्यात यावे. उजनी धरणग्रस्तांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण होण्यासाठी उजनी धरणाच्या वरील 19 धरणांतील एकूण 20 टीएमसी पाणी प्रत्येकी 10 टीएमसीप्रमाणे सोडावे. कालवा सल्लागार समितीमध्ये करमाळा तालुक्यातील दोन व इंदापूर तालुक्यातील दोन उजनी धरणग्रस्त प्रतिनिधींची निवड करावी, अशी मागणी धरणग्रस्त संघर्ष समितीने केली आहे.

Back to top button