ठाणे: कल्याण येथून विद्यार्थ्याचे अपहरण करणारे दोघे जेरबंद | पुढारी

ठाणे: कल्याण येथून विद्यार्थ्याचे अपहरण करणारे दोघे जेरबंद

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिमेतील शहाड परिसरातून दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेत अंबरनाथ येथील एका विद्यार्थ्याचे चार जणांनी अपहरण करून त्याला म्हारळ जवळच्या टेकडीवर नेले होते. तेथे चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण करून अपहृत विद्यार्थ्याकडील 16 हजारांची रोकड लुटण्यात आली होती. या अपहरणकर्त्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकून गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

विनायक मदने आणि बबलू जडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नीरज भोलानाथ यादव (वय 20, रा. चिखलोली, अंबरनाथ) या अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सटकलेल्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून विनायक मदने, विजय आणि आर्यन या तिघा अपहरणकर्त्यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी पहाटे 2.40 च्या सुमारास शहाड जकात नाक्या नाक्यावर घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या नीरज यादव याला तिघा अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवर बसवून कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावाजवळील टेकडीवर नेले होते. तेथे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमक देऊन त्याच्याकडील डेबिट, क्रेडिट कार्डसह रोख रक्कम काढून घेतली. अपहरणकर्त्यांनी जवळच असलेल्या एटीएममधून नीरज समोरच त्याच्या बँक खात्यातील 16 हजारांची रक्कम काढली.

तेव्हापासून वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पित्रे आणि त्यांचे सहकारी फरार अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. अखेर शोध मोहिमेला यश आले. पोलिसांच्या तावडीत दोघे सापडले. मात्र अपहरणकर्त्यांपैकी अन्य एकजण हाती लागला नसून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वी अशा पद्धतीने गुन्हे केले आहेत का ? याचाही पोलिस चौकस तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button