Exclusive : २०५०ला मुंबई खरोखर समुद्राखाली जाणार का? पुरांचा जागतिक तापमान वाढीशी काय संबंध? | पुढारी

Exclusive : २०५०ला मुंबई खरोखर समुद्राखाली जाणार का? पुरांचा जागतिक तापमान वाढीशी काय संबंध?

काही दिवसांपूर्वी चेन्नई शहाराला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये पुराचा सामना करते. पूर्वी पश्चिम किनारपट्टीवर दुर्मिळ चक्रीवादळं आता सातत्याने घोंगावू लागली आहेत, त्यामुळे किनारपट्टी असुरक्षित बनू लागली आहे. या सगळ्या घटनांचा हवामान बदलाशी याचा काय संबंध आहे? २०५०ला खरोखर मुंबई समुद्राखाली जाईल का? अशा काही प्रश्नांची उत्तरे देणारी डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांची ही विशेष मुलाखत. (Mumbai Floods and Climate Change)

( डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल हे Indian Institute of Tropical Meteorology चे संशोधक आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यावर ते संशोधन करतात. जागतिक पातळीवरील Intergovernmental Panel on Climate changeसाठीचे ते प्रमुख लेखक आहेत.) 

प्रश्न : शहरी भागांतील पूर आणि हवामान बदल यांचा काय संबध आहे?

डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल

उत्तर – हवामान बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. याचा किनारपट्टीवरील शहरी भागातील पुरांवर काय परिणाम होईल, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून लक्षात घेतले पाहिजे. मुंबईसारख्या महानगरांत दरवर्षी पूर येत असतो, ही स्थिती भविष्यात कशी असेल यावर खोलात जाऊन विचार केला पाहिजे. (Mumbai Floods and Climate Change)

अरबी समुद्र हा दिवसेंदिवस अधिक उष्ण होत आहे. त्यातून मुंबई परिसरातील हवेतील ओलावा वाढतो आहे. त्यामुळे पाऊस जास्त होईल, अतिवृष्टींच्या घटनांत वाढ होईल आणि पुराची तीव्रता वाढत जाईल. मान्सूनचा पॅटर्न बदलला असल्याचे आपण पाहत आहोत. याचा मुंबईसारख्या शहरी भागातील सांडपाणी निचऱ्यावर मोठा ताण येत असून, त्यातून अचानक येणाऱ्या पुरांच्या घटनांत चिंताजनक वाढ झाली आहे. समुद्राच्या पातळीतही वाढ होत असल्याने मुंबईत पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो आणि पूरस्थिती अधिकच बिकट होते.

प्रश्न : मुंबई २०५०ला पाण्याखाली जाईल असे म्हटले जाते, यावर तुमचे मत काय? Mumbai Floods and Climate Change

उत्तर – समुद्राच्या पातळीत जी वाढ होत आहे, त्याचा ट्रेंड लक्षात घेता असे होणार नाही; पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पूरस्थिती दीर्घकाळ राहील आणि पुराचे पाणी जास्त जागा व्यापेल. मुंबईची निर्मितीच ‘पाण्या’वर झाली आहे. त्यामुळे मुंबईचा काही भाग नेहमीच समुद्राच्या पातळीच्या खाली असतो. एकीकडे समुद्राची पातळी वाढत असताना मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी येणे हे मोठ्या संकटाला निमंत्रण ठरणार आहे. याला आपण Compound Floods म्हणतो. अशा पुरांमुळे मुंबईतील बराचसा भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर काय उपाययोजना केल्या जातात यावर मुंबईचं भवितव्य अवलंबून असेल.

प्रश्न : शहरी पुरांना जागतिक तापमान वाढ हे एकमेव कारण आहे का? 

मुंबईसारख्या मोठ्या शहरांत भेडसावत असलेल्या पूरस्थितीला फक्त हवामान बदल हे एकमेव कारण नाही. या पुरांमागे विविध घटक कारणीभूत ठरत आहेत. नियोजनशून्य विकास, काँक्रिटीकरण, आणि जमिनीचा वापर यामुळे नद्या गुदमरत आहेत. पूर्वी पाण्याचा नैसर्गिक निचरा व्हायचा, ती व्यवस्था नष्ट होत चालेली आहे, जल-व्यवस्थेवर अतिक्रमण होत आहे. काँक्रिटीकरण आणि बांधकामांमुळे पृष्ठभागातून पाणी जमिनीत झिरपत नाही. घनकचऱ्याचे नीट व्यवस्थापन न झाल्याने ड्रेनेज, इतर जलस्त्रोत तुंबतात आणि त्यातून सांडपाणी व्यवस्थेची वहनक्षमता घटते.

विविध सरकारी विभाग, एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावामुळे पूरस्थितीवर मात करण्यासाठी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. पूरस्थितीला तोंड कसे द्यावे याबद्दलची जागृती नागरिकांच्या पातळीवर आणि प्रशासनाच्या पातळीवर नसते, त्यामुळे पुरांमुळे होणारे नुकसान वाढते. मुंबईतील पूरस्थितीच्या मागे ही काही कारणं आहेत. दरवर्षी आपण मान्सून येण्याची आणि वाट पाहातो आणि तात्पुरती मलमपट्टी करतो. अशा उपाययोजना पुरेशा नाहीत. आपल्याला दीर्घकालीन विचार करून धोरणांची आखणी करावी लागेल आणि वर उल्लेख केलेल्या समस्यांवर उपाय योजावे लागतील. यामध्ये विविध घटकांत परस्पर सहकार्य आवश्यक आहे. सरकारी संस्था, नागर रचनाकार, आर्किटेक्ट, संशोधक, इंजिनिअर आणि सामाजिक संस्था यांच्या सहभागातून सर्वंकष असे धोरण बनवून शहरी पुरांवर उपाययोजना कराव्या लागतील. सार्वजनिक आणि खासगी संस्थाच्या परस्पर सहकार्यातून निधीची उभारणी करून, कल्पकतेने या समस्येवर मार्ग काढावा लागेल.

प्रश्न : पश्चिम किनारपट्टीला जागतिक तापमान वाढीचा कसा फटका बसेल? 

उत्तर – भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हवामान बदलाचा फटका बसेल, याचे कारण अरबी समुद्राचे तापमान वेगाने वाढत आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनमध्ये चक्रीवादळाची वारंवारता, तीव्रता आणि अतिवृष्टीच्या घटनांत वाढ होत आहे. समुद्राच्या पातळीत होणारी वाढ याचाही मोठा धोका पश्चिम किनारपट्टीला आहे. समुद्राची पातळी वाढल्याने सखल भाग पाण्याखाली जाईल आणि लाखो लोकांना याचा फटका बसेल.

प्रश्न : अरबी समुद्र चक्रीवादळांसाठी अधिकाधिक पोषक बनत आहे का? 

उत्तर – अरबी समुद्र चक्रीवादळांसाठी अधिकाधिक पोषक बनत आहे, असे मी एका लेखात म्हटले होते. अरबी समुद्रात गेल्या काही दशकांत चक्रीवादळांची तीव्रता, वारंवारता आणि चक्रीवादळांचा कालावधी यात वाढ झाल्याचे विविध अभ्यासांतून दिसून आलेले आहे. आपण ज्याला ‘जागतिक तापमान वाढ’ म्हणतो, त्यातील त्यातील ९३ टक्के उष्णता ही समुद्रात जाते. ‘अरबी समुद्र’ ही जी व्यवस्था आहे, त्याचे तापमान वेगाने वाढत आहे. अरबी समुद्र पूर्वी शांत आणि थंड मानला गेला होता; पण या समुद्राचे तापमान आता वाढलेले आहे. सध्या अरबी समुद्राचे तापमान २८ डिग्री सेल्सिअसच्या वर आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी उष्णता आणि ओलावा यांचा सातत्याने पुरवठा व्हावा लागतो. सहाजिकच अरबी समुद्र चक्रीवादळांसाठी अधिकाधिक पोषक बनत चालला आहे. चक्रीवादळांची फक्त तीव्रता वाढली आहे असे नाही तर या चक्रीवादळांचा कालवधी ८० टक्केंनी वाढलेला आहे. चक्रीवादळाचा कालावधी वाढणे म्हणजेच अधिक कालावधीसाठी किनारपट्टीवरील नागरिकांना या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button