Weather Update : राज्यात 26 नोव्हेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस
पुणे : पुढारी वृत्तसेवा : तामिळनाडू ते केरळदरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या चक्रीय स्थितीचे रूपांतर 26 नोव्हेंबरला कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तामिळनाडू ते केरळ दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात 25 नोव्हेंबरला चक्रीय स्थिती तयार होणार आहे. 26 नोव्हेंबरला या चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. तसेच 27 नोव्हेंबर रोजी हा पट्टा बंगालच्या उपसागराकडे सरकणार असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.
हा पट्टा आग्नेय बंगालचा उपसागर ते अंदमान समुद्राच्या दरम्यान राहणार आहे. या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामामुळे उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. राज्याबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील काही भागातही पाऊस बरसणार आहे.
25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान या जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’
कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव.
हेही वाचा
भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्थेची दुर्दशा : राहुल गांधी
जळगाव : नवीन कायदे केल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? रघुनाथ पाटील यांचा सवाल