संजय राऊत म्हणाले, “आता भाजपने नौटंकी बंद करावी” | पुढारी

संजय राऊत म्हणाले, "आता भाजपने नौटंकी बंद करावी"

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसटी कर्मचारी आंदोलनावरून आणि नवाब मलिकांच्या आरोपांवर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ” सर्व प्रकरणांमध्‍ये राज्यपालांनी लक्ष घालायला हवं. भाजपने नौटंकी बंद करावी”, अशी टीका त्यांनी केली.

“शिवसेना कष्टकऱ्यांचं नेतृत्व करते. महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत आहे. ज्यांनी आरोपांची परंपरा सुरू केली, त्यांची आता पळता भुई होत आहे. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण कुठेतरी थांबवा. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालायला हवं. भाजपने नौटंकी बंद करावी. मलिकांचे आरोप हे संतापातून होत आहेत. महाराष्ट्र कधीही कष्टकरी नागरिकांसोबत गद्दारी करणार नाही. कोरोनाकाळात एसटीचा प्रचंड तोटा वाढला त्यातून हे संकट उद्भवलं आहे. भूलथापांना बळी पडू नका”, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले, असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे”, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे असं म्हणतात की, “अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे”,  असेही त्‍यांनी नमूद केले.

“राजकीय पक्षांनीदेखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या”, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.

Back to top button