सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती; वळसे-पाटील यांची माहिती | पुढारी

सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती; वळसे-पाटील यांची माहिती

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांना पतपुरवठा करणार्‍या सहकारी संस्थांचे केंद्र शासनाच्या मदतीने बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना अवसायनात काढण्यास स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाशिवाय संस्था अवसायनात काढू नये, असे निर्देश सहकारमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अमरावती विभागीय सहकार खात्याच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गांभीर्याने समोर येत आहे. वेळीच व पुरेसा कर्जपुरवठा झाला नसल्यास शेतकरी अधिक व्याजदराने कर्ज घेतात व परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे सावकारी कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पतपुरवठ्यासाठी चांगल्या संस्था आवश्यक असून, सोसायटी प्रामुख्याने कर्ज वाटप आणि वसुली ही दोन कामे करतात. वसुलीअभावी अनिष्ठ तफावत येऊन संस्था बंद पडल्यामुळे शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा होणे थांबते. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी अवसायनातील संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर दिला पाहिजे.

Back to top button