मडगाव : मुसळधार पावसाने काजूकोट्टो गावाला जोडणारा पूल गेला वाहून | पुढारी

मडगाव : मुसळधार पावसाने काजूकोट्टो गावाला जोडणारा पूल गेला वाहून

मडगाव; विशाल नाईक : सांगे मतदारसंघातील डोंगरमाथ्यावर वसलेला आणि दुर्गम भाग म्हणुन ओळखल्या काजूकोट्टो या अदिवासी गावावर परतीच्या पावसाने कहर माजवला आहे. ढगफुटी समान परिस्थिती निर्माण होऊन डोंगरावरून अचानकपणे वाहुन आलेल्या पाण्याच्या ओघात गावाला जोडणारा एकमेव साकव आणि रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला आणि शाळेत गेलेले विध्यार्थी गावाबाहेर अडकुन पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहित मिळताच स्थानिक आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत काजूकोट्टो गावाला भेट दिली असुन वाहून गेलेल्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबधित बातम्या 

गेल्या चार दिवसांपासुन दक्षिण गोव्याला परतीच्या पावसाने झोडपुन काढले आहे. बऱ्याच भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. या संततधार पावसाचा फटका शनिवारी (दि.३०) रोजी काजूकट्टा या आदिवासी गावाला बसला आहे. १०६ लोकसंख्या असलेल्या या गावात स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही पक्का रस्ता पोहोचलेला नाही. वन खात्याचे किचकट नियम आणि खासगी जमीन मालकांच्या नाकारतेपणामुळे आजही या गावतील लोक डोंगर माथ्यावरिल कच्चा रस्त्याचा वापर करत आहेत.

२०१२ मध्ये आमदार सुभाष फळदेसाई यांनी येथील ओहोळावर स्वखर्चाने साकव घालून लोकांना तिसकोंड या गावी जाण्यासाठी वाट करून दिली होती. दर पावसाळ्यात हा साकव वाहून जात होता आणि पुन्हा त्यांची डागडुजी केली जात होती. शनिवारी ढगफुटी समान स्थिती निर्माण होऊन डोंगरमाथ्यावरून अचानकपणे पाण्याचा एक ओघ गावात आला त्यात हा साकव आणि रस्ता पुर्णपणे वाहुन गेला. ही घटना घडली त्यावेळी बरेच विद्यार्थी शाळेत गेले होते. ते गावाबाहेरच अडकुन पडले.

गावातील लोकांचा इतर भागांशी संपर्क तुटला. आयटी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रदिप गावकर यांनी ताबडतोब समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली. फळदेसाई यांनी रातोरात प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबर घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आपण सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन पक्क्या रस्त्यासाठी गेल्या बऱ्याच वेळापासुन अडकून पडलेली संपादक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासंबंधी चर्चा करणार आहे असे त्यांनी सांगितले.

काजूकट्टा हा गाव सांगे मतदारसंघाच्या डोंगरमाथ्यावर वसलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून या गावात जायला रस्ता नाही. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर या आदिवासी गावाची भयंकर परिस्थिती समोर आली आहे. आमदार सुभाष फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजूकट्टा ते तिसकोंड येथे जाण्यासाठी साडेतीन किलोमीटरची पायपीट लोकांना करावी लागते. दर वर्षी हा रस्ता पावसात वाहून जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करत आहे. बहुतांश भाग राखीव वनक्षेत्रात येतो.

वन खात्याकडून रस्त्यासाठी परवानगी मिळावी यासाठी विविध स्थरावर प्रयत्न करण्यात आले आहेत. पण वन खाते तयार नाही. खासगी जमिन मालकांशी चार वेळा बैठक घेऊन चर्चा केली आहे, पण ते जी तडजोड करण्यास तयार नाहीत. नगरनियोजन खात्याकडे रस्त्याच्या संबंधिची फाईल पाठवण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होणे आवश्यक आहे त्यासाठी संपादन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे अशी माहीती त्यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button