Mohammad Iqbal : ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तान हमारा’ लिहणारे कवी इकबाल दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून बाहेर | पुढारी

Mohammad Iqbal : ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तान हमारा’ लिहणारे कवी इकबाल दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून बाहेर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) बीए कार्यक्रमातून ‘सारे जहाँ से अच्छा… हिन्दोस्तान हमारा’ हे गीत लिहिणारे प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांचा पाठ अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या शैक्षणिक परिषदेने शुक्रवारी (२६ मे) अभ्यासक्रमाशी संबंधित अनेक बदल केले आहेत. या बदलांमध्ये अल्लामा इकबाल यांना राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहे. यासह हिंदू आणि आदिवासी अभ्यासासाठी नवीन केंद्रे स्थापन करण्याच्या प्रस्तावांना शैक्षणिक परिषदेने मान्यता दिली आहे. (Mohammad Iqbal)

दिल्ली विद्यापीठाच्या १०१४ व्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमावर झालेल्या चर्चेदरम्यान अल्लामा इकबाल यांना राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या कुलगुरू प्रा. योगेश सिंह म्हणाले की, भारत तोडण्याचा पाया रचणाऱ्यांचा अभ्यासक्रमात समावेश नसावा. (Mohammad Iqbal)

कुलगुरूंचा प्रस्ताव सभागृहाने एकमताने मंजूर केला. बैठकीत अंडरग्रॅज्युएट करिक्युलम फ्रेमवर्क (UGCF) 2022 अंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरसाठीचा अभ्यासक्रम मंजूर करण्यात आला. इकबाल यांना हटवण्याबरोबरच यावेळी कुलगुरूंनी डॉ.भीमराव आंबेडकर यांना अधिकाधिक शिकवण्याचा आग्रह सुद्धा धरला. (Mohammad Iqbal)

इकबाल यांच्याबाबत कुलगुरू म्हणाले, इकबाल यांनी ‘मुस्लिम लीग’ आणि ‘पाकिस्तान चळवळ’ यांना पाठिंबा देणारी गाणी लिहिली. भारताची फाळणी आणि पाकिस्तानच्या स्थापनेचा विचार सर्वप्रथम इकबाल यांनी मांडला होता. अशा व्यक्तींना शिकवण्यापेक्षा आपल्या राष्ट्रीय वीरांचा अभ्यास करायला हवा. (Mohammad Iqbal)

इकबाल यांना बीए राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या ‘मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट’ या अध्यायात तपशीलवार शिकवण्यात येत होते. अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये हा धडा शिकवला जात होता. याशिवाय अभ्यासक्रम आणि वेगवेगळी केंद्रे स्थापन करण्याचे प्रस्ताव परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. या प्रस्तावांवर अंतिम शिक्का दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद (EC) लावाणार आहे. त्यांची बैठक ९ जून रोजी होणार आहे.

कोण आहेत मोहम्मद इकबाल

इकबाल हे उर्दू आणि पर्शियन भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत, त्यांनी “सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तान हमारा” हे प्रसिद्ध गाणे लिहिले. ते भारतीय उपखंडातील सर्वात प्रमुख उर्दू आणि पर्शियन कवी आहेत. त्यांना पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी म्हणूनही ओळखले जाते.

अभाविपने केले निर्णयाचे स्वागत 

इकबाल यांच्या विषयीचा पाठ अभ्यासक्रमातून काढून टाकण्याच्या निर्णयाचे स्वागत करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दिल्ली युनिटने ट्विटमध्ये म्हटले की, “दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मोहम्मद इकबालला डीयूच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद इकबाल यांना ‘पाकिस्तानचे तत्त्वज्ञानी जनक’ म्हटले जाते. जिना यांना मुस्लिम लीगमध्ये नेता म्हणून स्थापित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारताच्या फाळणीला मोहम्मद अली जिना जितके जबाबदार आहेत, तितकेच मोहम्मद इकबाल जबाबदार आहेत.


अधिक वाचा :

Back to top button