१ जूनपासून दोन महिने मासेमारी बंद; मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश | पुढारी

१ जूनपासून दोन महिने मासेमारी बंद; मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : समुद्रात मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत.

सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार १ जून ते ३१ जुलैपर्यंत राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीस बंदी घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

ही पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. ही बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, केल्यास नौका व नौकेवर बसवलेली उपसाधने व मासेमारी सामग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे.

पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना अवागमन निषिद्ध आहे, असे मत्स्य व्यवसाय विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button