नागपूर : विद्यार्थ्यांनी उजळवला महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास | पुढारी

नागपूर : विद्यार्थ्यांनी उजळवला महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वराज्याच्या निर्मितीत प्राणांची आहुती देणारे शुरवीर, महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आणि देशभक्तीपर गितांवर उत्तम नृत्याविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली शौर्याचा इतिहास जागविला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

महाराष्ट्र राज्याच्या ६४ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड, विज्ञान पर्यवेक्षक जयेश वाकुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या गितावरील दक्षिण अंबाझरी येथील मुंडले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेला नृत्याविष्काराला उपस्थितांनी मनोसोक्त दाद मिळवून दिली.

यासोबतच कोंडाळी येथील लखोटिया भुतळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हे कण कण मे जाना’, शिशु ज्ञानमंदीर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मै इतिहास का आयना हु’, नयापुरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’, सेंट पॉल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘लल्लाटी भंडार’, सुदर्शन हायस्कूल इतवारीच्या विद्यार्थ्यांनी ‘माय भवानी’ अशा नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण अकरा शाळांच्या विद्यार्थी सहभागी झाले होते. नागपूर जिल्हा पथकाचे नैतृत्व करणारे सावनेर तालुक्यातील टाकळी येथील भन्साळी बुनियादी विद्यामंदीराचे स्काऊट मास्टर प्रितम टेकाडे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देवून या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. सी. एस गर्ल्स ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. शालिनी तेलरांधे यांनी केले तर उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button