त्र्यंबकेश्वरला आखाडा परिषदेची सत्यशोधन समिती, धूप दाखविण्याच्या प्रथेचा करणार अभ्यास
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
संदल मिरवणुकीवेळी त्र्यंबकेश्वर मंदीरात कथित प्रवेश प्रकरणी अखिल भारतीय आखाडा परिषद साधुंची येथील निलपर्वतावर बैठक होऊन त्यात मंदिरात अन्य धर्मियांच्या प्रवेशाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या प्रकरणी सविस्तर माहिती घेत तेथील पंरपरा जाणून घेण्यासाठी सर्वानुमते सात साधुंची सत्यशोधन समिती नेमण्यात आली. या समितीचे सदस्य शहरातील जेष्ठ नागरिक, पुरोहित, पूजक व पूजारी यांच्या समवेत चर्चा करून निष्कर्ष काढणार आहे.
मंदिरात संदल मिरवणुकीतील व्यक्ती धुप दाखवण्यासाठी आत जात होते की नाही? असल्यास आतमध्ये कोणत्या जागेपर्यंत जात असायचे? तसेच आणखी काही प्रथा होती का? यासारखे मुद्दे विचारात घेऊन सत्य शोधण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून तो केंद्र शासन, राज्य शासन यांना सादर करण्यात येणार आहे. समितीला 1 जून 2023 पर्यंत अहवाल सादर करण्याची कालमर्यादा दिलेली आहे. यावेळेस आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद महाराज, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, निरंजनी आखाडा ठाणापती धनंजयगिरी महाराज, जुना आखाडयाचे ठाणापती अजयपुरी महाराज, जयगिरी महाराज, विष्णुगिरी महाराज यासह विविध आखाडयांचे आणि आश्रम, मठाचे साधु उपस्थित होते.
हेही वाचा :