टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार | पुढारी

टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बीसीसीआयने टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून परिधान करण्यात येणा-या जर्सीमध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या जर्सीचे नुकतेच लॉचिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या मेगा इव्हेंटसाठी टीम इंडियाचे क्रिकेटर्स नव्या को-या डिझाईनच्या जर्सीत दिसणार आहेत. बीसीसीआयने या जर्सीचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यात फोटोमध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, के. एल. राहुल. रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह दिसत आहेत.

भारतीय संघ टी 20 विश्वचषकातील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. सध्या टीम इंडियाची टी 20 जर्सी नेव्ही ब्लू रंगाची आहे. 1992 च्या विश्वचषकात टीम इंडियाने अशीच जर्सी परिधान केली होती. नवीन जर्सी देखील नेव्ही ब्लू असून डिझानमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र ही नवी जर्सी 1992 च्या वर्ल्डकपमधील जर्सी सारखीच आहे.

टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू…

टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पात्रता फेरीसह एकूण 45 सामने खेळले जातील. क्वालिफायर फेरीत 12 सामने आणि सुपर -12 फेरीत 30 सामने खेळले जातील.

याशिवाय, उपांत्य सामना आणि अंतिम सामना होईल. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी जर्सीसंदर्भात वाद समोर आला होता. पाकिस्तानने त्यांच्या संघाच्या नव्या जर्सीवर ‘आयसीसी पुरुष टी -20 विश्वचषक भारत’ लिहिण्याऐवजी, ‘आयसीसी पुरुष टी -20 विश्वचषक यूएई’ असे लिहिले होते. खरंतर भारत विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भूषवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील सामने युएई आणि ओमान येथे होणार आहेत.

दरम्यान, टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचा ‘आयपीएल-2021’मधील फॉर्म हा निवड समितीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यांत फटकेबाजी करून फॉर्म मिळवला. परंतु, हार्दिक पंड्या, राहुल चहर, भुवनेश्वरकुमार यांचा फॉर्म अजूनही परतलेला नाही.

त्यात हार्दिकची तंदुरुस्ती ही संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अशात बीसीसीआयने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणार्‍या तीन खेळाडूंना यूएईमध्ये थांबवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याकडे हार्दिकची ‘रिप्लेसमेंट’ म्हणून पाहिले जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा गोलंदाज हर्षल पटेल कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर आणि शिवम मावी यांना थांबण्यास सांगितले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हर्षलने 15 सामन्यांत 32 विकेटस् घेत ‘पर्पल कॅप’ आपल्या नावावर केली आहे.

भारताचा टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेतील पहिला सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे आणि पहिला सामना खेळण्याच्या 7 दिवस आधी संघात बदल केला जाऊ शकतो. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक याने आयपीएलमध्ये गोलंदाजी केलेली नाही आणि फलंदाजीतही त्याला फार कमाल करता आली नाही. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज उम्रान मलिक याची बीसीसीआयने ‘नेट बॉलर’ म्हणून निवड केली आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार हर्षल, व्यंकटेश व शिवम यांनाही थांबण्यास सांगितले जाऊ शकते. ‘सपोर्ट कालावधीच्या सात दिवस आधी संघात बदल करता येऊ शकतो. टीम इंडियाचा सपोर्ट कालावधी 23 तारखेला सुरू होणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत संघात बदल करण्याची मुभा आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.

‘हार्दिकला वगळण्याचा निर्णय झालेला नाही; पण तो झाल्यास शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यात निवड समिती हर्षल पटेलला यूएईत थांबण्यास सांगू शकते,’ असेही सूत्रांनी सांगितले.

 

Back to top button