सोलापूर : पुल आणि रस्ते विकासासाठी १५ कोटींचा निधी मिळणार; आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांना यश | पुढारी

सोलापूर : पुल आणि रस्ते विकासासाठी १५ कोटींचा निधी मिळणार; आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांना यश

जेऊर; पुढारी वृत्तसेवा : कंदर (ता.करमाळा) येथे राम मंदिरालगत प्रत्येक पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होत असते. त्या अनुशंगाने उजनी धरणाच्या बॅकवॉटरवरील रस्ते व पुलांच्या कामास पुरसंरक्षक कामे अंतर्गत १५ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असुन फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती ज्ञानेश पवार यांनी दिली.

कंदर (ता.करमाळा) हे गाव उजनी बॅकवॉटर लगत आहे. सदर ठिकाणी कंदर-दहीवली रस्ता, कंदर-उपळवाटे शिवरस्ता-सिना-माढा बोगदा सर्विस रोड, सिना माढा बोगदा कॅनॉल रोड असे रहदारीचे रस्ते आहेत. या ठिकाणाहुन उजनी धरण व भिमा नदीस दोन मोठे ओढे येऊन मिळतात. पावसाळ्यात या ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पुर परिस्थिती निर्माण होत असते. मागील तीन-चार वर्षात सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे रस्ता व पुल वाहुन गेलेले होते. २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर विरोधी पक्षनेता या नात्याने उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः पहाणी केली होती. सदर परिस्थिती उजनी धरणाच्या बॅकवॉटरमुळे असल्याने जलसंपदा विभागाच्या पुरसंरक्षण योजनेअंतर्गत १) कंदर-दहीवली रोड पुल बांधकाम- ६० मीटर व रस्ता- १२० मीटर २) कंदर उपळवाटे शिवरस्ता/सिना-माढा बोगदा सर्विस रोड पुल बांधकाम- १० मीटर व रस्ता-१५ मीटर ३) सिना-माढा कॅनॉल रोड पुल बांधकाम २० मीटर व रस्ता- १०० मीटर अशा कामांसाठी अंदाजे १० ते १५ कोटी रुपयांची तरतुद होणे गरजेचे आसल्याचे आमदार मोहिते-पाटील यांनी फडणवीस यांना सांगितले होते. त्यावर फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार असुन फळे, भाजीपाला व इतर शेतमाल बाजारपेठेत सहज उपलब्ध होणार आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे विकासाच व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यांनी नेहमीच करमाळा तालुक्याच्या विकासाला हातभार लावला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी मला कंदर परिसरातील अतिवृष्टी झालेल्या ठिकाणचा प्रश्न कायमचा सोडवायचा आहे, असे सांगितले व आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटून येथील परिस्थिती आणि अतिवृष्टी पाहणी दौऱ्याची आठवणी सांगितली. त्यांनी तात्काळ सकारत्मकता दर्शवत संबधितांना आदेश दिले.
– ज्ञानेश पवार (कंदर, ता – करमाळा)

कंदर येथे उजनी बॅकवॉटरमुळे केळी, द्राक्ष व इतर फळे-भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकतो. सदर ठिकाणचे पुल आणि रस्ते वेळोवेळी पावसाळ्यात वाहून जातात बॅकवॉटरहून पाईपलाईन केलेल्या शेतकऱ्यांची पाईप वाहून गेलेली आहे त्या ठिकाणी कायमचा मार्ग काढण्याची विनंती आमदार रणजित यांनी केली होती. त्यांनी आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्धल त्यांचे आभार.
– नानासाहेब लोकरे (माजी व्हा.चेअरमन, अदिनाथ कारखाना)

Back to top button