कोल्हापुरातील खून प्रकरणी चौघांना ठोकल्या बेड्या; पूर्व वैमनस्यातून केला खून | पुढारी

कोल्हापुरातील खून प्रकरणी चौघांना ठोकल्या बेड्या; पूर्व वैमनस्यातून केला खून

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा- पाचगाव रोडवर महापालिका हद्दीत जगतापनगर येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

आर्थिक आणि पूर्व वैमनस्यातून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २५, रा. शिंगणापूर) याचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिले आहे.
कटाचा सूत्रधार गणेश येलगट्टी, अथर्व हावल, वृषभ साळोखे सोहम शेळके अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. एलसीबी आणि करवीर पोलिसांनी रात्रभर छापासत्र राबविले होते. त्यात चारही मारेकरी पोलिसांच्या हाताला लागल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुख्य संशयित गणेश येलगट्टी आणि ऋषिकेश यांच्यात आर्थिक कारणातून पूर्व वैमनस्य निर्माण झाले होते. त्यांच्यात यापूर्वी वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. ऋषिकेश गणेश आणि वृषभला खुन्नस देत होता. त्यामुळे मारेकरांनी ऋषिकेश काटा काढण्याचा बेत रचला दारू पिण्याच्या आमिषाने ऋषिकेशला जगतापनगर येथील मैदानावर बोलवले. ऋषिकेशला दारू पाजल्यानंतर चव्हाण त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला. त्याचे दगडाने आठ वेळा डोके ठेचले.

मारेकरी वृषभ याने रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या ऋषिकेशचे डोके भल्या मोठ्या दगडाने आठ वेळा ठेचल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Back to top button