अन्नधान्यांच्या साठवणुकीसाठी केंद्र सरकारचा पुढाकार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अन्न पुरवठा तसेच वाढत्या किंमतीमुळे अनेक देशांमध्ये अन्न सुरक्षा संबंधी चिंता वाढवली आहे.अशात देशातील अन्नसुरक्षेला प्राधान्य देत केंद्रातील मोदी सरकारने विशेष पावले उचलली आहे. धान्य साठवणुकीसाठी असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे अन्नधान्यांची होणारी नासडी रोखण्यासाठी सरकारने खासगी गोदाम उभारण्यास प्रोत्साहन दिले आहे.
‘संपूआ’च्या काळात २००८ पासून सुरू झालेली ‘पीईजी’ या खासगी गोदाम बांधण्याच्या योजनेवर मोदी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेसच्या काळात थंडबसत्यात पडलेल्या या योजनेवर मोदी सरकारने वेगाने काम करीत अन्नसुरक्षा सुनिश्चित केली आहे,असा दावा खासदार हिना गावित यांनी ‘दैनिक पुढारी’ सोबत बोलताना केला. योजनेनुसार देशातील २२ राज्यांमध्ये एकूण मंजूर १५२.१५ लाख मॅट्रिक टन क्षमतेपैकी १४६.१० लाख मॅट्रिक टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात आले असल्याचे गावित म्हणाल्या.