शिंदेंकडे पोझिशन, पण पॉवर फडणवीसांकडेच : सुषमा अंधारे यांची टीका | पुढारी

शिंदेंकडे पोझिशन, पण पॉवर फडणवीसांकडेच : सुषमा अंधारे यांची टीका

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे हे नावालाच मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पोझिशन आहे. परंतु पॉवर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सगळी मलिद्याची खाती भाजपकडे आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. माझे सर्व ४० भाऊ उपाशी आहेत, त्यांना केवळ त्यांची सत्ता आल्याचा भ्रम झालाय, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त सुभाष अंधारे औरंगाबादेत आलेल्या आहेत. त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे आदी उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु आतापर्यंत या सरकारने जनतेसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. उथळ आणि तत्कालिक मुद्यांवर हे सरकार बोलत आहे. राज्यात बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या यासारखे अनेक प्रश्न आहेत. पण कोणत्याच विषयावर हे सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री शिंदे हे नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत. कारण वित्त, गृह यासह सर्व महत्वाची खाती फडणवीस आणि भाजपकडे आहेत. महाप्रबोधन यात्रेतून आम्ही काही प्रश्न विचारत आहोत. त्याचीही योग्य उत्तरे मिळत नाही, असेही अंधारे यांनी सांगितले.

कशासाठी केला अट्टाहास ?

शिवसेनेपासून वेगळे होण्याची वेगवेगळी कारणे शिंदे-गटातील आमदार देत आहेत. त्यात हिंदुत्व, निधी न मिळणे, महाराष्ट्राची अस्मिता जपणे, शिवसेना वाचविणे आदी कारणांचा समावेश आहे. परंतु ही सगळी कारणं तकलादू आहेत. मुद्दा सत्तेचा होता. पण आताही भाजपसोबत जाऊन यांना काय मिळाले. तर काहीच नाही. मग कशासाठी हा अट्टाहास केला होता? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button