गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी; सुषमा अंधारे यांची टीका | पुढारी

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी; सुषमा अंधारे यांची टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाने सुरू केलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाची सभा होती. या सभेवरही पोलीस प्रशासनाकडून बंदी आणण्यात आली. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंधारे म्हणाल्या, मुक्ताईनगरमधील नियोजित सभेवर सरकारकडून आकसबुद्धीनं, सत्तेचा गैरवापर करत, दरारा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भेत असंविधानिक काहीही होणार नाही, आम्ही सभ्य भाषेत कायदा काय आहे, महापुरुषांचा विचार काय आहे, संतवचन काय आहे, महाराष्ट्र कशा पद्धतीनं जोडता येईल तसेच महाराष्ट्राच्या समस्या काय आहेत? या संबंधानं फक्त लोकांशी जाऊन बोलत आहोत.

ही घटनेची पायमल्ली आहे. सभा स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य हा माझा अधिकार आहे, तो मला मिळालाच पाहिजे. ग्रामीण भागात दंगलीचा इतिहास नाही. पण पोलिसांना तसं वाटत असेल तर त्यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पण ते त्यांच्याकडून होत नसेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरत आहेत. त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही. अशा शब्दांत अंधारे यांनी कठोर टीका केली आहे. आमच्या सभेचा धसका घेण्याची गरज नाही. सरकार ज्या पद्धतीनं घाबरतंय ते पाहता आमची सभा नाकारण्याला मी पॉझिटिव्ह अर्थानं घेते. बहुतेक सरकार खूप घाबरलंय, अस्वस्थ झालंय, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा;

Back to top button