नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये : सरन्यायाधीश उदय लळित  | पुढारी

नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये : सरन्यायाधीश उदय लळित 

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरुण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरूवातीला अनेक अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा, असा सल्‍ला सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला. महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या राज्यस्तरीय वकील परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
या वेळी सरन्यायाधीश लळित म्‍हणाले, “सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगावाचे ऋणानुबंध कायम आहेत. येथील मित्र, वर्गमित्र यांच्याशी आजही संपर्कात आहे. मी ३९ वर्षे वकिली व्यवसायात आहे. मला वकिली व्यवसातून उदंड किर्ती, मान, पैसा सर्व मिळाले. आता सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी जे आहे ते परत करायचे आहे. वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे, अडथळे पार होतील.”
देशातील आज निम्म्याहून अधिक लाेकसंख्‍या तरुण आहे. येणार्‍या काळात युवकांच्या हातात देश असेल. ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेवूनच आम्ही शिखर गाठले. सध्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला संशोधन, अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. युट्यूबसुद्धा तुम्हाला वकिलांचा युक्तीवाद पाहायला मिळेल, सदैव सचोटीने काम करा, कक्षा भव्य आहेत, असेही ते म्‍हणाले.

सोलापूरचे चार रत्न : सुशीलकुमार शिंदे

या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले, “वकिलांनी सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सोलापूरच्या मातीतल्या माणसाने न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवल्याने सोलापूरकरांचा उर भरून येतो. चार हुतात्मा यांच्या पद्धतीने सोलापूरचे चार रत्न उदय लळित, विनय जोशी, एन.जे. जमादार आणि आशितोष कुंभकोणी आहेत.” सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेड्यातील, मागास समाजातील वकिलांनी मदत करावी. जिल्ह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्रमाशिवाय ज्ञान वाढणार नाही : न्यायमूर्ती दिपांकूर दत्ता

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमुर्ती दिपांकूर  दत्ता यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सरन्यायाधीश लळित यांच्या आठवणी, न्यायालयात ताकदीने आपली बाजू मांडणारे, सामान्यांना न्याय देणारे ते आहेत. नवोदित वकिलांनी सर्व कायद्यांचा अभ्यास काळजीपूर्वक करून कायदे जाणून घ्यावेत. श्रमाशिवाय आपले ज्ञान वाढणार नाही. जीवनाला महत्त्‍व देवून नम्रतेने भाषेवर प्रभूत्व वाढवावे, असेही न्यायाधीश दत्ता यांनी सांगितले.

पैशासाठी वकिली करू नका : महाअधिवक्‍ता आशितोष कुंभकोणी

सोलापूरचा माणूस न्याय व्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याबाबत नितांत अभिमान आहे. विनम्र स्वभाव, संयमी वृत्तीचे, कोणालाही अपशब्द न बोलणारे, चौकटीबाहेर विचार करणारे सरन्यायाधीश लळित आहेत. त्यांचे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत. नवोदितांनी पैशासाठी वकिली करू नये, पैशाकडे लक्ष न देता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन  राज्याचे महाअधिवक्‍ता आशुतोष कुंभकोणी यांनी केले.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभावे यांनी प्रामाणिकपणाला महत्व देऊन समाजाला न्याय द्यावा.निष्पक्ष न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकील परिषदेचे उदघाटन सरन्यायाधीश उदय लळित यांनी केले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलींद थोबडे यांनी प्रास्ताविकातून बार कौन्सिलची माहिती आणि कार्याचा आढावा घेतला. बार कौन्सिलतर्फे शिक्षण, कार्यक्रमांची शिबीरे घेऊन नवोदित वकिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 15 वर्षात 500 शिबीरे घेतली, ज्यांना बार आणि बेंचची आवड त्यांना मार्गदर्शन केले. महिला दिनाला महिलांविषयी गुन्हे याबाबत शिबीर घेऊन जागृती केली. बार कौन्सिलचे डिजीटायजेशन केले असून सर्वांना यामार्फत सेवा दिली जाणार आहे,
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ई-गव्हर्नन्सचे प्रकाशन केले. लळित यांच्या हस्ते बार कौन्सिलच्या डिजीटायजेशनचे कळ दाबून लोकार्पण करण्यात आले. यावेळी लळित कुटुंबातील सदस्य सविता लळित यांनी लळित कुटुंबातील चार पिढ्या वकिलीमध्ये असल्याचे सांगितले. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, सरन्यायाधीश यांचे वडील निवृत्त न्यायमूर्ती उमेश लळित, पत्नी अमिता लळित, श्रीमती झूमा दत्ता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आदींसह वकील उपस्थित होते. या परिषदेत राज्यातील सर्व जिल्ह्यातील वकिलांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, न्यायाधीश एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद थोबडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा

Back to top button