भारतात 'या' जिल्ह्यात रावण आणि त्याच्या सैन्यांवर झाडल्या जातात गोळ्या, 125 वर्षांपासून जपली जाते ही परंपरा
पुढारी ऑनलाईन: देशभरात रावण दहनाची परंपरा आहे, मात्र झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी शहरात रावणाच्या अंताची अनोखी परंपरा आहे. मेवाड भागात दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्यासह त्याच्या सैन्यावर बंदुकीतून गोळीबार केला जातो. प्रथम सैन्यावर गोळ्या झाडून त्यांचा खात्मा केला जातो. त्यानंतर रावणावर मशाल बाणांनी गोळ्या झाडत पुतळा जाळला जातो.
125 वर्षांपासून सुरू आहे रावणावर बंदुकीतून गोळ्या झाडण्याची परंपरा
सुमारे 125 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.उदयपुरवाटी जमात परिसरात स्थायिक झालेल्या दादूपंथी समाजातील लोक या परंपरेचे पालन करतात. वेगळ्या पद्धतीने रावणाचा अंत पाहण्यासाठी केवळ उदयपुरवाटी नव्हे तर आजूबाजूच्या गावांमधूनही हजारो लोक येतात.
उदयपुरवाटी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवरात्रीत कलश स्थापनेसह दादूपंथींचा दसरा उत्सव सुरू होतो. प्रथम दादूपंथ समाजातील लोक जमात शाळेत असलेल्या बालाजी महाराजांच्या मंदिरात ध्वजारोहण करून उत्सवाची सुरुवात करतात. नऊ दिवस येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दादू मंदिरात दादूवाणीचे अखंड ग्रंथ आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी चांदमारी परिसरात बंदुकांसह पारंपरिक तालीम केली जाते. त्यानंतर शस्त्रपूजन आणि कथा प्रवचन होते. असे अनेक कार्यक्रम घेतले जातात.
रावणाला गोळ्या घालण्यासाठी नऊ दिवस सराव
उदयपुरवाटीमध्ये नऊ दिवस रावणाला गोळ्या झाडण्याचा सराव केला जातो. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी माँ दुर्गेचा हवन केला जातो. शस्त्रांची पूजा केल्यानंतर सायंकाळी लोक मिरवणूक काढतात. मिरवणूक रावण दहनाचे ठिकाण असलेल्या नांगल नदीवर पोहोचते.
मातीच्या मटक्यापासून बनवतात सैन्य
रावणाचे सैन्य आहे, ते मातीच्या मटक्यापासून बनलेले असते. त्यावर पांढऱ्या रंगाने रंग देऊन डोळे आणि तोंड बनवले जातात. यानंतर ते एकमेकांच्या वर ठेवले जातात. हे सैन्य रावणाच्या दोन्ही बाजूला असते. आधी सैन्याला आणि नंतर रावणावर गोळ्या झाडल्या जातात.