भाजपला बारामतीत अश्वमेध रोखल्यासारखा त्रास होतोय; जयंत पाटील यांचा टोला | पुढारी

भाजपला बारामतीत अश्वमेध रोखल्यासारखा त्रास होतोय; जयंत पाटील यांचा टोला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवार यांच्या बारामतीत भाजपला होत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारपासून दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी २०२४ च्या निवडणूकीत बारामती मतदारसंघावर भाजपच्या विजयाचा दावा करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना त्यांनी सूचक इशारा दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

बारामतीमधील जनता कशी आहे, हे माहिती आहे. त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सुर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु बारामती पवारांना सोडणार नाही एवढं घट्ट नातं आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपने सध्या बारामती टार्गेट केली आहे. थोड्या दिवसात आमचाही प्लॅन समोर येईल. त्यावेळी कोणाकोणाला टार्गेट करतोय हे विरोधकांच्या लक्षात येईल. सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून भाजप निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. याचा अर्थ भाजपला आपली लोकप्रियता कमी व्हायला लागली आहे, हे लक्षात आले आहे. जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते तेव्हा अशा गोष्टी भाजप करते. चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाहीत. परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणे त्यांना शोभत नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button