'या' १४ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; ९ ऑगस्टपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.
यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या भागाकडून राज्याकडे बाष्प वाहू लागले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे.
6 ते 9 ऑगस्ट या भागांत ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे (घाटमाथा), सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
5 Aug; राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता.काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता.
खाली दिलेले इशारे शनिवार पासून आहेत.
२४ तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार,मेघगर्जनेची शक्यता. pic.twitter.com/4MqJ0qrUaR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2022