IND vs ENG 3rd ODI : ऋषभ, हार्दिकचा विषय हार्ड | पुढारी

IND vs ENG 3rd ODI : ऋषभ, हार्दिकचा विषय हार्ड

मँचेस्टर ; वृत्तसंस्था : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे (125) शतक आणि हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी (71 धावा, 4 विकेटस्) या दोघांच्या अफलातून कामगिरीमुळे भारताने (IND vs ENG 3rd ODI) तिसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडचा 5 विकेटस्नी पराभव करीत मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. कसोटी मालिका बरोबरीत राहिल्यानंतर टी-20 मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती. त्यानंतर वनडे मालिकेतही 2-1 असा विजय मिळवला.

मँचेस्टरच्या मैदानावर खेळलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला 45.5 षटकांत 259 धावांत रोखले. हार्दिकने आपल्या कारकिर्दीतील

सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविताना 24 धावांत 4 विकेटस् घेतल्या. इंग्लंडकडून बटलरने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्यानंतर भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी शतकी भागीदारी करीत भारताचा विजय निश्चित केला.

इंग्लंडच्या 260 धावांचे आव्हान पेलताना भारताची सुरुवात खराब झाली. लॉर्डस् वनडे सामन्यात 24 धावांत 6 विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करणार्‍या रिसे टॉप्लीने तिसर्‍या सामन्यातही धक्कातंत्र कायम राखत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज टोपलीत घातले. त्याने पहिल्या तीन षटकांत भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन व रोहित शर्मा यांच्यासह विराट कोहली यांना स्वस्तात माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. शिखर धवन एक धाव काढून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला केवळ 17 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने 16 धावा केल्या. 72 धावांवर भारताची चौथी विकेट पडली होती.

भारताची भरकटणारी ही नाव हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी सावरली. एरव्ही तोडफोड फलंदाजी करणार्‍या ऋषभ पंतने संयमी फलंदाजी केली. त्याने अर्धशतक झळकावण्यासाठी 71 चेंडू घेतले. हार्दिक पंड्याने मात्र 43 चेेंडूंत अर्धशतक साजरे केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 99 चेंडूंत शतकी भागीदारी केली. हार्दिक पंड्या 55 चेंडूंत 71 धावा काढून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. त्याने ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूंत 133 धावांची भागीदारी केली आणि भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताचा विजय सुनिश्चित झाला. भारताला यावेळी 14 षटकांत 54 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर ऋषभ पंतने आपला गियर बदलला आणि 106 चेंडूंत शतक पूर्ण केले. (IND vs ENG 3rd ODI)

ऋषभने रवींद्र जडेजाच्या मदतीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताचा 42.1 षटकांत विजय पूर्ण झाला. ऋषभ 113 चेेंडूंत 125 धावा करून नाबाद राहिला. त्याने 16 चौकार आणि दोन षटकार मारले. जडेजाने नाबाद 7 धावा केल्या. तत्पूर्वी, रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मह सिराजने जॉनी बेअरस्टो (0) व ज्यो रूट (0) यांना चार चेंडूंत माघारी पाठवले. जेसन रॉय व बेन स्टोक्स यांनी तिसर्‍या विकेटसाठी 47 चेंडूंत 54 धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा हार्दिक पंड्याने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. जेसन रॉय 41 धावांवर तर स्टोक्स 27 धावांवर माघारी परतला.

मोईन अली व कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला होता. त्यांनी 85 चेंडूंत 74 धावा झोडल्या. जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मोईन अली (34) बाद झाला. पंतने भन्नाट कॅच घेतला. बटलरने दुसर्‍या बाजूने संघर्ष सुरू ठेवताना अर्धशतक पूर्ण केले.

Back to top button