पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएल 2024 हंगामातील महत्वाचा साखळी सामना बंगळुरू आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. या सामन्याच्या निकालातून यंदाच्या हंगामातील प्ले ऑफचे चित्र स्पष्ट होणार आहे. याआधी कोलकाता, राजस्थान आणि हैदराबाद यांनी आपले प्ले ऑफमधील तिकीट कन्फर्म केले आहे. आता चेन्नई-बंगळुरू सामन्यातील विजय मिळवण्याऱ्या संघाला प्ले ऑफचे चौथे तिकीट मिळणार आहे. जाणून घेवूया बंगळुरूमधील हवामानाविषयी आणि पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला फायदा होणार याविषयी…
भारतीय हवामान खात्याने 18 मे रोजी मध्य बेंगळुरू परिसरात ताशी 40-50 किमी वेगाने वारे, वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बेंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, CSK आणि RCB यांच्यातील सामन्यादरम्यान पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. हसामना सुरू होण्याच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता आकाश ढगांनी झाकले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियममधील पावसाचे पाणी निचरा हाेण्याची व्यवस्था चांगली असल्याने पाऊस थांबल्यानंतर अर्ध्या तासात खेळ सुरू होऊ शकतो, ही दिलासादायक बाब आहे.
बंगळुरूमध्ये सकाळी हवामान आल्हाददायक होते. दिवसा सूर्यप्रकाश अपेक्षित होता. संध्याकाळी वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान बेंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी संध्याकाळी पावसाची 50 टक्के शक्यता आहे.
यंदाच्या मोसमात सामन्यात पाऊस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी हंगामात दोन सामने पावसामुळे वाहून गेले होते, तर एका सामन्यात पावसामुळे षटके कमी करण्यात आली होती. मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे 16-16 षटकांचा करण्यात आला होता, तर 13 मे रोजी होणारा कोलकाता आणि गुजरातमधील सामना रद्द करण्यात आला होता. कर हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला होता. अशा परिस्थितीत IPL 2024 चा सर्वात मोठा सामना पावसामुळे गमवावा असे चाहत्यांना वाटत नाही.
चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात पाऊस पडला आणि कटऑफ वेळेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही, तर आरसीबीला नुकसान सहन करावे लागेल आणि सीएसके संघाला प्लेऑफचे तिकीट मिळेल. CSK संघ सध्या 13 सामन्यांत सात विजय आणि सहा पराभवांसह 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर बेंगळुरू संघ 13 सामन्यांत सहा विजय आणि सात पराभवांसह 12 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, अशा परिस्थितीत CSK 15 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनेल, तर RCB 13 गुणांसह शर्यतीतून बाहेर पडेल.