चंद्रपूर : पुरात वाहून जाणारी बैलजोडी बाहेर काढण्यात यश : घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद | पुढारी

चंद्रपूर : पुरात वाहून जाणारी बैलजोडी बाहेर काढण्यात यश : घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: शेतावर जाण्यासाठी पूर आलेल्या नाल्यातून बैलगाडीने मार्ग काढीत असताना पुराच्या प्रवाहाने बैलजोडीसह शेतकरी वाहून जाऊ लागला. दरम्यान, नाल्यालगत असलेल्या शेतक-यांनी प्रसंगावधान राखत शेतकऱ्यांसह बैलजोडीला वाचविण्यात यश मिळवले. या घटनेचा सर्व थरार कॅमे-यात कैद झाला आहे. गहिनीनाथ वराटे असे शेतकऱ्याचे नाव असून, त्याच्याच मालकीची बैलजोडी होती.

कोरपना तालुक्यातील नांदा येथील नाल्याला आलेल्या पूरात दोन व्यक्तीसह बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मागील दहा दिवसांपासून हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. गेली १५ वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो.

शेतीच्या अत्यावश्यक कामासाठी बैलजोडीत असलेल्‍या दोघांसह पुरातून वाट काढत असताना बैलगाडी वाहून जाऊ लागली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले आहेत. दळणवळणाच्या समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button