विजय मल्ल्या यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयात साेमवारी होणार शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देश सोडून पळालेले तत्कालीन लिकर किंग विजय मल्ल्या यांना किती शिक्षा द्यायची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालय सोमवारी (दि. ११ ) करणार आहे. किंगफिशर एअरलाईन्सचे दिवाळे काढून मल्ल्या यांनी विदेशात पळ काढला होता. बँकांची सुमारे 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप मल्ल्या यांच्यावर आहे.
न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवून आपल्या मुलांच्या नावावर 4 कोटी डॉलर्स पाठविल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांच्याविरोधात अवमानना खटला चालविला होता. या खटल्यात मल्ल्या यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने किती शिक्षा द्यायची याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार सोमवारी न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ मल्ल्या यांना शिक्षा सुनावणार आहे.
विजय मल्ल्या यांच्यावरील न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप 2017 साली सिध्द झाला होता. या निकालाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशा विनंतीची याचिका मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिका सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली फेटाळून लावली होती. त्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने दोन आठवड्यात स्वतः हजर राहून बाजू मांडण्याचे निर्देश मल्ल्या यांना दिले होते. दोन आठवड्यात हजेरी न लावल्यामुळे मल्ल्या यांना आता शिक्षा सुनावली जाणार आहे.
हेही वाचा :
- जोहान्सबर्ग शहरातील बारमध्ये हल्लेखोरांचा अंधाधुंद गोळीबार, १४ जणांचा मृत्यू
- धक्कादायक : तुरुंग अधिकार्यांनी महाठग सुकेशकडून दरमहा दीड कोटी रुपयांची लाच! रोहिणी तुरुंगाच्या ८२ अधिकारी- कर्मचार्यांवर गुन्हा दाखल
- Zelensky : झेलेन्स्कींची भारताविरुद्ध करवाई, थेट राजदूतांनाच हटवले