बीड : दोन युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू, यात्रेनिमित्त पाणी आणताना दुर्घटना
गेवराई : पुढारी वृत्तसेवा : गावातील यात्रेसाठी कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील राजापूर याठिकाणी आज शनिवारी सकाळी घडली. मोहन नाना आतकरे (वय १८) व शिवाजी ज्ञानदेव इंगोले (वय १८ ) दोघे रा. निपाणी जवळका ता.गेवराई जि.बीड) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका याठिकाणी श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. दरम्यान आज सकाळी गावातील तरुण गोदावरी नदीकाठी असलेल्या राजापूर याठिकाणी कावडीने पाणी आणण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी हे तरुण गंगेत स्नान करत असताना मोहन आतकरे व शिवाजी इंगोले या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या युवकांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचलंत का ?