सांगली : हातणोलीत वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून एक ठार; २ जण गंभीर जखमी
तासगाव : पुढारी वृत्तसेवा : रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे हातनोली (ता. तासगांव ) येथे घराची भिंत कोसळून कमल नारायण माळी (वय ७०) या वृद्धेचा मृत्यू झाला, तर तिचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री उशिरा घडल्याने त्याच्या मदतीला कोणी आले नाही. सकाळी घटना उघडकीस येताच घटनेचा पंचनामा करण्यात आला.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल (रविवार) सायंकाळपासून तालुक्यात तुफान वादळी वारे सुटले होते. त्यातच पावसाला सुरूवात झाली. माळी कुटुंब धामणी रस्त्यावरील मळ्यात राहते. त्यांचे कच्च्या सिमेंट विटांचे पत्र्याचे घर आहे.
रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याने घरावरील छत उडून जाऊन घरापासून दोनशे फूट लांब अंतरावर जाऊन पडले, तर घराची एक भिंत कमल आणि दीपक याच्या अंगावर पडली. त्यात कमल यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर नारायण व दीपक हे दोघेजण गंभीर जखमी झाले.
ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. जखमी दोघांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.