

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणत्याही राजकीय पक्षाला आपले स्थान बळकट करण्यासाठी निवडणुकीमधील विजय महत्वपूर्ण असतो. सातत्याने येणारे अपयशामुळे राजकीय पक्षाला खिंडार पडण्यास सुरुवात हाेते. अनेक निकटवर्ती नेते तुमची साथ साेडण्याची भाषा करतात. लवकरच याचा अनुभव समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवामुळे समाजवादी पार्टीमध्ये बंडाचे वारे वाहू लागल्याची जाेरदार चर्चा सध्या उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काका शिवपालसिंह यादव यांनी थेटपणे केलेला विराेध. यानंतर एकेकाळचे समाजवादी पार्टीचे 'आधारस्तंभ' अशी ओळख असणारे आझम खान यांच्या माध्यम प्रभारी फसाहत अली खाँ यांनी रविवारी केलेल्या घणाघाती टीकेमुळे लवकरच आझम खानही अखिलेश यादव यांची साथ सोडतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ( Akhilesh and Azam Khan ) फसाहत यांच्या टीकेवर अखिलेश यांनी माैन बाळगल्यामुळे लवकरच ही शक्यता वास्तवात उतरेल, असे मानले जात आहे.
रामपूर येथे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना फसाहत अली खाँ म्हणाले की, मागील काही वर्ष आझम खान हे करागृहात आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे अनेक कार्यकर्ते अनाथ झाले. आम्ही कोठे जाणार? कोणासमोर आपली व्यथा मांडणार, अशी त्यांची अवस्था झाली. आझम खान यांनी समाजवादी पार्टीसाठी रक्त सांडलं. आपलं संपूर्ण जीवन पक्षाला दिले. त्या पक्षाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आमच्या कपड्यातून दुर्गंधी येते. आमचे नेते तुम्हाला मतेही देणार आणि तुरुंगातही जाणार? त्यांच्यावर कारवाई होत असताना आमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी मौन बाळगले आहे, असा आराेपही त्यांनी केला.
आम्ही तुम्हाला व तुमच्या वडिलांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले. यंदाही आम्ही केलेल्या मतदानामुळेच समाजवादी पार्टीला १११ जागा मिळाल्या आहेत. तुमच्या माणसांनी तुम्हाला मतदान केले नाही. तरीही तुम्हीच मुख्यमंत्री होणार. विरोधी पक्ष नेतेपदही तुम्हालाच मिळणार. आता तर कोणीही नेता दुसरा पक्षही स्थापन करु शकत नाही. कारण तुमच्यामुळे आम्ही भाजपबरोबर शत्रुत्व केले. आम्हाला शिक्षा होत असताना तुम्ही याचा आंनद घेत आहात, असा टीकाही त्यांनी केली.
आझम खान यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविराेधा तुम्ही लोकसभा असो की उत्तर प्रदेश विधानसभा सभागृहात यामध्ये ही एक शब्दही बोलला नाही. त्यांना कारागृहात भेटण्यासाठी एकदाच गेला हाेता. आझम खान कारागृहातून बाहेर येवूच नयेत, अशी अखिलेश यादव यांची इच्छा असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होते. तेच आता खरं वाटत आहे, असेही फसाहत अली खाँ म्हणाले.
मागील अडीच वर्षांपासून आझम खान हे सीतापूर कारागृहात बंद आहेत. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सत्तांतर झाले. भाजप सत्तेत आल्यानंतर आझम खान यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्यात आली. मात्र याबाबत अखिलेश यादव यांनी मौन बाळगले आहे. आता नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही समाजवादी पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता आझम खान समर्थक आक्रमक झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी तिकिट वाटपातही आझम खान यांच्या समर्थकांना डावलण्यात आले होते. केवळ आझम खान व त्यांच्या मुलालाच तिकिट देण्यात आले. याचीही खदखद समर्थकांमध्ये आहे. उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी आझम खान यांना संधी दिले जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र येथेही अपेक्षाभंग झाला. त्यामुळेच आता त्यांचे समर्थक आक्रमक झाले असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :
पाहा व्हिडीओ :