औरंगाबाद : अजिंठा येथे शेततळ्यात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : दहावीचा पेपर देऊन शेततळ्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रा पैकी तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अनाड रोडलगत असणाऱ्या शेततळ्यात बुधवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. उमेरखान नासेरखान (वय १६ रा . उर्दू हायस्कूल जवळ अजिंठा), अनास हफीज शेख (वय-१६, रा . उर्दू हायस्कूल जवळ अजिंठा) अक्रमखान अयुबखान (वय-१६ रा. बगीच्या मस्जिद) असे तिन्ही मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
दहावीचा पेपर देऊन पाच मित्र अजिंठा जवळील अनाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतातील शेततळ्यामध्ये पोहायला गेले. उमेर खान, शेख अनाज, आक्रमखान या तिघांनी शेततळ्यात एकाच वेळी पोहायला उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने भांबावून गेलेले तिघे बुडाले. त्यांना वाचायचा मित्र फैजान खान, रियान खान यांनी खूप प्रयत्न केला परंतू त्यांना ही पोहता येत नसल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
फैजान यांनी ग्रामस्थांना माहिती देताच शेकडो ग्रामस्थ शेततळ्याकडे गेले. तिघांना काढून अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटना स्थळी डीवायसीपी विजय मराठे, सपोनि अजित विसपुते, बिट अंमलदार अक्रम पठाण, भागवत शेळके यांनी भेट दिली. पंचनामा करून अजिंठा पोलीस ठाण्यात उशिरा अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.