गुजराती उद्योगपतीकडून देशाच्या इतिहासात सर्वांत मोठा बँक घोटाळा; CBI आणि SBI वर प्रश्नचिन्ह ! | पुढारी

गुजराती उद्योगपतीकडून देशाच्या इतिहासात सर्वांत मोठा बँक घोटाळा; CBI आणि SBI वर प्रश्नचिन्ह !

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात सर्वात मोठ्या २२८४२ कोटींच्या बँक घोटाळा या प्रकरणात सीबीआयच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे एसबीआयलाही प्रश्न पडला आहे की, अनेक वर्षांनी याबाबतच्या तक्रार का समोर येत आहेत?. तर यातील सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि त्याचे माजी सीएमडी ऋषी कमलेश अग्रवाल आणि तत्कालीन संचालक संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी कुमार यांच्याविरुद्ध २२,८४२ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

२२८४२ कोटींच्या बँक घोटाळा २०१२ मध्ये समोर आला होता, मात्र, ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. म्हणजेच या प्रकरणात सीबीआय आणि तक्रारदार स्टेट बँक ऑफ इंडिया या दोघांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पहिल्या तक्रारीनंतर सीबीआयने मार्च २०२० मध्ये एसबीआयकडून काही स्पष्टीकरण मागवले होते. एसबीआयने ऑगस्ट २०२० मध्ये स्पष्टीकरणासह नवीन तक्रार दिली, परंतु, सीबीआयने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी जवळपास १८ महिन्यांनंतर याबाबतचा गुन्हा नोंदविला गेला. एसबीआयने तक्रारीत स्पष्टीकरण देताना सीबीआय इतके दिवस गप्प कसे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता.

गुजरातमधील कंपनी एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि एबीजी इंटरनॅशनल लिमिटेड यांना २८ बँकांच्या कन्सोर्टियमने कर्ज दिले होते. एसबीआय बँकेच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे त्यांचे खाते नोव्हेंबर २०१३ मध्ये एनपीए झाले. याच दरम्यान कंपनीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही.

यानंतर, कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले, ज्याचा अहवाल २०१९ मध्ये आला. या कंसोर्टियमचे नेतृत्व ICICI बँकेने केले, परंतु, सर्वात मोठी सार्वजनिक बँक असल्याने SBI ने CBI कडे तक्रार दाखल केली. याच दरम्यान देशातील अनेक बँकांना २२८४२ कोटींचा तोटा झाला. ज्यामध्ये ICICI बँकेचे सर्वाधिक ७, ०८९ कोटींचे नुकसान झाले.

या प्रकरणी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सीबीआयने मुंबई, पुणे, सुरत आणि भरूचसह १३ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात बॅकाची अनेक कागदपत्रे आणि दस्त ऐवज, पुरावे जप्त करण्यात आले. तपासात हेही स्पष्ट झाले की, सर्व बॅकेतील घोटाळे हे देशातच घडले असल्याचे स्पष्ट झाले.

सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि त्याचे माजी सीएमडी ऋषी कमलेश अग्रवाल आणि तत्कालीन संचालक संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी कुमार यांच्याविरुद्ध २२,८४२ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही कंपनी गुजरातमधील दहेज आणि सुरतमध्ये जलवाहू जहाजे बनवण्याचे आणि दुरुस्तीचे काम करते. आतापर्यंत कंपनीने १६५ जहाजे बांधली आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button